Saturday, May 2, 2026

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

First Tribal University  : विदर्भात साकारणार  देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व

मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या 'कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेने' आता आपल्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा मोठा संकल्प केला आहे. संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात देशातील पहिले 'आदिवासी विद्यापीठ' उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ५०० कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे २०० एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून, त्यातील १५० कोटी रुपये 'व्हिसा' आणि 'मास्टरकार्ड' सारख्या जागतिक कंपन्यांच्या CSR निधीतून, तर उर्वरित ३५० कोटी रुपये लिस्टिंगच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. कामात पारदर्शकता आणण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ट्रस्टची नोंदणी करण्यात आली आहे. सोबतच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील ९३ तालुक्यांमध्ये 'एकल हब' उभारले जातील, ज्याद्वारे सॅटेलाइट आणि दृक-श्राव्य माध्यमांतून अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवले जाईल. नागपूर येथील पहिल्या 'एकल हब'च्या उद्घाटनानंतर आता हे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारले जाणार आहे.

दुसरीकडे, संस्थेने मुंबई महानगरपालिकेसोबतही शैक्षणिक भागीदारी केली असून पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या सामाजिक चळवळीला बळकट करण्यासाठी संस्थेने 'एक रुपया' दानाचे अभिनव आवाहन केले असून, क्यूआर कोडद्वारे संकलित होणारा हा निधी आदिवासी भागातील 'बांबू लागवडीच्या' प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार, हा बांबू कोळशाला पर्याय म्हणून जैविक इंधन निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल, ज्यामुळे प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल. येणाऱ्या काळात आपल्या एकल विद्यालयांची संख्या १,३२२ वरून ५,००० पर्यंत नेण्याचे आणि सुमारे १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे मोठे ध्येय संस्थेने ठेवले आहे. मुंबई पोलीस, महानगरपालिका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्या सहकार्याने सुरू असलेले हे कार्य आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनमानसात पोहोचवले जात असून, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था आता नव्या जोमाने सज्ज झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >