नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. तर, 55 हजार 449 जणांना केशरी किंवा पिवळ्या शिधापत्रिकेवरून पांढऱ्या शिधापत्रिकेवर ट्रान्सफर करण्यात आले आहे. पण हे करण्यामागचं कारण काय हे जाणून घेऊया.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या करदात्यांवर महत्त्वाची कारवाई केलीय. राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार नाशिक जिल्ह्यातील जे लोकं आयकर भरत आहेत, त्यांना आता रेशन विसरावे लागणार आहे. शिवाय केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकेवरील योजनांचाही त्यांना लाभ घेता येणार नाही.
या कार्यवाहीला जिल्हा पुरवठा शाखेकडून सुरूवात करण्यात आली आहे. अनेकांना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या शिधापत्रिकेच्या यादीतून हटवण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील, 45 हजार 948 आयकरदात्यांची नावं शिधापत्रिकेच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. तर, 55 हजार 449 जणांना केशरी किंवा पिवळ्या शिधापत्रिकेवरून पांढऱ्या शिधापत्रिकेवर ट्रान्सफर करण्यात आले आहे. त्यांचे इन्कम सोर्स तपासून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गरजू कुटुंबांना रेशन कार्डचा लाभ देण्यास प्राधान्य
आयकर भरणारे लोकं रेशन कार्डवर मिळणाऱ्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेत नाहीत. शिवाय, रेशनिंग दुकानातील सुद्धा अन्न धान्य ते विकत घेत नाहीत. त्यापेक्षा गरजु व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात यावा, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे गरजु व्यक्ती असतील किंवा ज्यांचे उत्पन्न कमी आहेत, अशा कुटुंबांना रेशन कार्डाचा लाभ देण्यास प्राधान्य दिला जाणार आहे.
जिल्हा पुरवठा शाखेकडून गरजूंना नव्या शिधापत्रिका दिल्या जात आहे. यानुसार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा पुरवठा शाखेकडून पडताळणी करून नावे कमी करून शिधापत्रिका देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. बहुतांश आयकरदाते केशरी, पिवळी शिधापत्रिकाधारकसुद्धा असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे त्यांचे रेशन कार्ड लवकरच पांढरे करण्यात येणार आहे. तब्बल 56 हजार आयकर दात्यांच्या शिधापत्रिका पांढऱ्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा शाखेच्या सुत्रांनी दिली आहे. ही प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबवली जात आहे. आयकर विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पुरवठा शाखेकडून तपशीलाची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येत आहे.