कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.. या टप्प्यात राज्यातील १४२ जागांचे भवितव्य ठरणार आहे. तृणमूल काँग्रेस आपला दक्षिण बंगालचा बालेकिल्ला राखणार की भाजप सत्ता खेचण्यात यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याआधी पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी तब्बल 91 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मतदानाचा हा दुसरा टप्पा राज्याची राजकीय दिशा ठरवणारा आहे. ( West Bengal Legislative Assembly Election)
ममता बॅनर्जी -सुभेंदू अधिकारी आमने सामने
या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून असलेली निवडणूक ही भवानीपूर मतदारसंघात पार पडत आहेत. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुभेंदू अधिकारी (Mamata Banerjee Vs Subhendu Adhikari ) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लढत या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ठरत आहे. दरम्यान निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात उत्तर-२४ परगणामध्ये ३३ जागा, दक्षिण-२४ परगणातील ३१ जागा , हावडातील १६ जागा , नदिया येथील १७ जागा, हुगळी येथील १८ जागा तर पूर्व बर्धमानमधील १६ जागा आणि कोलकात्यातील ११ जागांचा समावेश आहे. ( West Bengal Election )
विधानसभा निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात आज ३.२१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १.६४ कोटी पुरुष व १.५७ कोटी महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८-१९ वर्षांचे ४.१२ लाख नवमतदार यंदा मतदान करतील. राज्यात सोमवारी सायंकाळी प्रचार थंडावला असला तरी राजकारण मात्र तापलेले आहे. राजकीय समीक्षकांनुसार, दक्षिण बंगाल जिंकल्याशिवाय बंगालची सत्ता मिळवणे अशक्य आहे. २०२१ च्या निवडणुकीत या १४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने १२३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ १८ जागा मिळाल्या होत्या.
भ्रष्टाचार, घुसखोरी अन... भाजपच आक्रमक प्रचार
भ्रष्टाचार, घुसखोरी, निवडणूक पश्चात हिंसाचार आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवर भाजपने आक्रमक प्रचार केला. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी मतदानानंतर ६० दिवस केंद्रीय दले बंगालमध्येच राहतील, असे आश्वासन सोमवारी मतदारांना दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला गड कायम राखणार की यंदा भाजप विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर राज्यात सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती येणार हे स्पष्ट होणार आहे.