मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे होण्यासाठी दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी पूर्ण वेळ उपस्थित रहावे. तसेच गाळ काढण्याच्या कामाचे नालेनिहाय व दिवसनिहाय नियोजन करावे. संगणकीय प्रणालीमध्ये दररोज अद्ययावत माहिती भरावी. तसेच ३१ मे २०२६ पर्यंत नाले स्वच्छतेची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. नाल्यांमधील सांडपाण्याच्या पृष्ठभागावर वाहणारा आणि तरंगणारा घनकचरा विशेषत: प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जाळ्या बसवाव्यात, असेही निर्देश बांगर यांनी दिले.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील नदी, मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पश्चिम उपनगरांमध्ये सुरु असलेल्या नदी, नालेस्वच्छता कामांची बुधवारी २९ एप्रिल २०२६ रोजी पाहणी केली. पश्चिम द्रुतगती महामार्गानजिक गोरेगाव (पूर्व) येथील वालभट नदी, गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानकाजवळील ओशिवरा नदी, गझधरबंध उदंचन केंद्राजवळील एसएनडीटी नाला, सांताक्रुझ (पश्चिम) येथील नॉर्थ ऍवेन्यू नाला येथे प्रत्यक्ष भेट देत बांगर यांनी नदी / नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
प्रारंभी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी गोरेगाव (पूर्व) येथील वालभट नदीची पाहणी केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून प्रवाहित होणारी वालभट नदी पुढे दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोकुळधाम वसाहतमार्गे पी दक्षिण विभागाच्या हद्दीतून ५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. बिंबीसार नाला या नदीला येऊन मिळतो. पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दगडमिश्रीत माती मोठ्या प्रमाणावर वालभट नदीत वाहून येते. त्यामुळे या नदीतून गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा बांगर यांनी आढावा घेतला.
ऑबेरॉय मॉल परिसरात साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरुपी निराकारण
दिंडोशीपासून सुरू होणा-या पिरामल नाल्यातील पाण्यास अवरोध निर्माण झाल्याने गेल्या वर्षी गोरेगाव (पूर्व) येथील ओबेरॉय मॉलसमोरील सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती. त्याचा आढावा घेत श्री. बांगर म्हणाले की, ओबेरॉय मॉल परिसरात पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे गरेजेचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, वाहतूक वर्दळीचा विचार करता पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत कामे करताना मर्यादा येत असल्या तरी त्यावर मात करावी. या ठिकाणी असलेल्या मोरीची प्रभावीपणे स्वच्छता करून वहन क्षमता वाढवावी. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करावे. कल्वर्टची सुधारणा तथा विस्तार करावा. अशी सूचना केली. पी दक्षिण विभाग हद्दीत एसआरपीएफ कंपाऊंडजवळील सेवा रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होतो. पावसाळ्याच्या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. पावसाळ्यानंतर कामे पूर्ण करावीत. सद्यस्थितीत उपसा पंपाद्वारे पाण्याचा निचरा होईल, हे सुनिश्चित करावे, असेही निर्देश बांगर यांनी दिले.
गोरेगाव (पश्चिम) मेट्रो स्थानकाजवळील ओशिवरा नदीतून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करताना बांगर म्हणाले की, या ठिकाणी कायमस्वरूपी असा 'रॅम्प' उभारून यंत्रे नदीत उतरविण्यात आली आहेत. ही सुयोग्य पद्धती आहे. ओशिवरा नदी, मोगरा नाला, इर्ला नाल्याजवळ उदंचन केंद्र उभारण्यात येत आहेत. अंधेरी (पश्चिम) येथील डी. एन. नगर येथे पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी अंतर्गत तसेच प्रमुख वाहिन्यांची सुधारणा करण्यात येत आहे. विलेपार्ले येथील स्वामी विवेकानंद मार्ग (S.V.Road) येथील पर्जन्य जलवाहिनीची सुधारणा / विस्तार करण्यात आला आहे. मिलन भूयार मार्ग उड्डाणपूल ते व्ही. एम. रोड जंक्शनदरम्यानच्या पर्जन्य जलवाहिनीची सुधारणा / विस्तार करण्यात येणार आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पावसाळ्याच्या कालावधीत पूर्ण करावी तसेच पावसाळ्यानंतरच्या आठ महिन्यांच्या कालावधीत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले.






