Tuesday, April 28, 2026

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का?

मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या देशात कोणीही करू शकत नाही, त्यांचा मान अढळ आहे. मात्र, सध्या महाराजांच्या नावावर जे निरर्थक वाद सुरू आहेत, ते चर्चेत राहण्यासाठी केलेले प्रकार असून ते अत्यंत असंवेदनशील आहेत," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकातील उल्लेखावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीमुळे वादाला तोंड फुटले आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "हे पुस्तक १९७९ साली लिहिण्यात आले. त्यावर आज इतक्या वर्षांनी वाद उकरून काढणे आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडणे हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी (संजय गायकवाड) हे पुस्तक वाचले आहे की नाही, हे मला माहिती नाही आणि आंदोलन करणाऱ्यांनाही आपण नेमके कशासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, हे ठाऊक आहे की नाही, यात शंका आहे." केवळ प्रसिद्धीसाठी ऐतिहासिक संदर्भांचा विपर्यास करून वाद निर्माण करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील हल्ल्यामागे 'सेल्फ रॅडिकलायझेशन'

- मुंबईत धर्म विचारून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेवरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सविस्तर भाष्य केले. हे प्रकरण 'सेल्फ रॅडिकलायझेशन' (स्व-कट्टरतावाद) स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या इंटरनेट आणि विशिष्ट साहित्याच्या माध्यमातून कट्टरतावादाचे विष पेरले जात आहे. त्यातूनच हा आरोपी तयार झाला असून, केवळ इतर धर्मीयांना लक्ष्य करण्याच्या जिहादी विचाराने तो प्रेरित झाला होता," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

- या तपासासाठी आता एटीएस आणि एनआयएची मदत घेतली जाणार आहे. आरोपीचे कुटुंब अमेरिकेत वास्तव्यास असून, तो स्वतःदेखील अनेक वर्षे परदेशात राहिला आहे. मुंबईत परतल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात आला आणि या कट्टरतावादाच्या साखळीत अजून किती तरुण अडकले आहेत, याचा सखोल तपास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Comments
Add Comment