महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः विदर्भातील अकोला शहरात या मोसमातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान ४६ अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
अकोल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. २१ एप्रिलला ४३.६ अंश, २२ एप्रिलला ४३.७ अंश, २३ एप्रिलला ४४.३ अंश, २४ एप्रिलला ४५ अंश तर २५ एप्रिलला तब्बल ४५.६ अंश तापमान नोंदवले गेले. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे सध्या जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत असल्याचे चित्र आहे.
मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी बँक खात्याची ...
जळगाव शहरातही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यात देखील तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेची तीव्रता कायम आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकर विविध थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. विशेषतः उसाचा रस हा आयुर्वेदिकदृष्ट्या फायदेशीर मानला जात असल्याने त्याला मोठी मागणी आहे.
मुंबईतही एप्रिल महिन्यातच तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर मुंबईकरांनी दुपारच्या वेळेत घरातच राहणे पसंत केले आहे.
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांत कोयत्याने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या ...
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे देशभरात विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने २४० गिगावॉटचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी २४२.७७ गिगावॉट इतकी नोंदवली गेली. वाढती उष्णता आणि एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेल्या हीटवेव्हमुळे देशभरात विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
उन्हाळी हंगामातली आतापर्यंतही ही सर्वोच्च पातळी आहे. कमाल तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्यादरम्यान असल्याने आणि उष्णतेच्या लाटांचा प्रभाव असल्यामुळे एसी, कुलर्स आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात पंप संचांचा वापर वाढल्यामुळेही विजेचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी अंदाजे २७० गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज विद्युत विभागाने वर्तवला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. राज्यभर उष्णतेचा कहर वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे.