Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः विदर्भातील अकोला शहरात या मोसमातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान ४६ अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.


अकोल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. २१ एप्रिलला ४३.६ अंश, २२ एप्रिलला ४३.७ अंश, २३ एप्रिलला ४४.३ अंश, २४ एप्रिलला ४५ अंश तर २५ एप्रिलला तब्बल ४५.६ अंश तापमान नोंदवले गेले. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे सध्या जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत असल्याचे चित्र आहे.


दरम्यान, परभणीत उष्माघातामुळे एका ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवाजी बबन कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि उष्णतेच्या तीव्रतेची गंभीरता अधोरेखित झाली आहे.



जळगाव शहरातही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्यात देखील तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेची तीव्रता कायम आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकर विविध थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. विशेषतः उसाचा रस हा आयुर्वेदिकदृष्ट्या फायदेशीर मानला जात असल्याने त्याला मोठी मागणी आहे.


लातूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढत असून अनेक ठिकाणी ४२ अंशांपर्यंत तापमान पोहोचले आहे. दुपारी एक ते चार या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. निलंगा तालुक्यातील औराद-शहाजनी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. धुळे शहरात ४४ अंश तापमानाची नोंद झाली असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. बुलढाणा शहरात तब्बल ६८ वर्षांनंतर तापमानाने ४३ अंशांचा टप्पा गाठला आहे. पूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा आता उष्णतेच्या झळा सहन करत आहे. यापूर्वी १९५४ आणि १९५८ मध्ये ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली होती, मात्र यंदा त्याहून अधिक तापमान नोंदले गेले आहे.


मुंबईतही एप्रिल महिन्यातच तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर मुंबईकरांनी दुपारच्या वेळेत घरातच राहणे पसंत केले आहे.



दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे देशभरात विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने २४० गिगावॉटचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी २४२.७७ गिगावॉट इतकी नोंदवली गेली. वाढती उष्णता आणि एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेल्या हीटवेव्हमुळे देशभरात विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.


उन्हाळी हंगामातली आतापर्यंतही ही सर्वोच्च पातळी आहे. कमाल तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्यादरम्यान असल्याने आणि उष्णतेच्या लाटांचा प्रभाव असल्यामुळे एसी, कुलर्स आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात पंप संचांचा वापर वाढल्यामुळेही विजेचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी अंदाजे २७० गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज विद्युत विभागाने वर्तवला आहे.


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. राज्यभर उष्णतेचा कहर वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार