Friday, April 24, 2026

AAP च्या १० पैकी ७ राज्यसभा खासदारांचा BJP मध्ये प्रवेश

AAP च्या १० पैकी ७ राज्यसभा खासदारांचा BJP मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत शुक्रवारी विधानसभेसाठी विक्रमी मतदान झाले. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची धाकधूक वाढली आहे. भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच दिल्लीतून एक मोठी बातमी आली आहे. आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतील दहा पैकी सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या खासदारांपैकी राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी दिल्लीतच पत्रकार परिषद घेऊन 'आप'पासून दूर आणि जनतेच्या जवळ जात असल्याचे जाहीर केले. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या हेतूने स्थापन झालेली आम आदमी पार्टी उद्देशांपासून दूर भरकटली असल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर काही तासांनी राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. याप्रसंगी नितीन नवीन यांनी राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांना मिठाई भरवली.

राघव चढ्ढा यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली. भारताच्या संविधानातील तरतुदींआधारे राज्यसभेतील आम आदमी पार्टीचे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदार भाजपमध्ये विलीन झाले आहेत. राज्यसभा अध्यक्षांना सादर केलेल्या दस्तऐवजावर सात खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. मी, इतर दोन खासदारांसोबत, स्वतः स्वाक्षरी केलेला दस्तऐवज सादर केला; असे सांगत चढ्ढा यांनी आम आदमी पार्टीला 'दे धक्का' दिल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले.

आम आदमी पार्टीच्या राज्यसभेत असलेल्या राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालिवाल, विक्रम साहनी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती देणाऱ्या पत्रावर सही केली आहे. हे पत्र राघव चढ्ढा यांनी संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासोबत राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केले आहे. ही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राघव चढ्ढा यांनी संविधानातील तरतुदींआधारे एखाद्या पक्षाच्या दोन तृतियांश किंवा त्यापेक्षा जास्त खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असे सांगितले.

राज्यसभेतल्या आम आदमी पार्टीच्या दहा पैकी सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ज्येष्ठांच्या सभागृहातील भाजपच्या सदस्य संख्येत ७ ने वाढ झाली आहे. 'आप'ला दणका बसण्याआधी भाजपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या १०६ होती. या संख्येत आता वाढ झाली असून ती ११३ झाली आहे. एनडीएच्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या आधी १४१ होती. पण 'आप'च्या सात जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ १४८ वर पोहोचले आहे. यामुळे साध्या (सामान्य) बहुमताच्या जोरावर राज्यसभेतून कोणतेही विधेयक मंजूर करून घेणे एनडीएसाठी अतिशय सोपे झाले आहे.

पंजाबच्या राजकारणावर परिणाम होणार : आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतील ज्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यातील सहा जण पंजाबचे आहेत. एकट्या स्वाती मालिवाल दिल्लीच्या आहेत आणि उर्वरित सहा जण पंजाबचे आहेत. यामुळे लवकरच पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या राजकारणावर प्रतिकूल परिणाम दिसून येण्याची शक्यता राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

भारतीय जनता पार्टी - ११३

सरकारला पाठिंबा देणारे नामनिर्देशित - ७

अण्णाद्रमुक - ५

जनता दल युनायटेड - ४

राष्ट्रवादी काँग्रेस - ४

तेलगू देसम पार्टी - २

शिवसेना - २

युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल - २

आसाम गण परिषद - १

नॅशनल पीपल्स पार्टी - १

पट्टाली मक्कल कत्ची - १

राष्ट्रीय लोक दल - १

राष्ट्रीय लोक मोर्चा - १

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले - १

जनता दल सेक्युलर - १

स्वतंत्र - २

राज्यसभेतील एनडीएचे एकूण संख्याबळ - १४८

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा