मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी दुपारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सव्वातीनच्या सुमारास बदलापूरहून आलेली जलद लोकल तांत्रिक बिघाडामुळे नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर वळवण्यात आली. मात्र त्या फलाटावर आधीच एक लोकल उभी असल्याने दोन्ही गाड्या समोरासमोर येण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोटरमनने तत्काळ ब्रेक लावत प्रसंगावधान दाखवले आणि संभाव्य अपघात टळला. या घटनेमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाहतूक कोलमडली, प्रवाशांचे हाल :
ऐन गर्दीच्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आणि CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सिग्नल यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या बॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, रखडलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.