Monday, April 20, 2026

Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३० जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार, कृषीमंत्र्यांनी दिले संकेत

Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३० जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार, कृषीमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई : आगामी खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट असून यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ३० जूनच्या आत राबवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुण्यातील शिवाजीनगर भागात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘सारथी’च्या सभागृहात खरीप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यंदा खरिपासाठी २०.१७ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, २८.०५ लाख क्विंटल साठा उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीतही राज्य सुरक्षित असून, ४८.८० लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत २५.१७ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध असून, टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार

कमी पावसाच्या अंदाजामुळे कृषी विभागाने हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी आणि ‘बीबीएफ’ तंत्रावर भर देण्याचे ठरवले आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी ‘महाकृषी’ आणि ‘महाविस्तार’ ॲपसह सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तसेच नुकसानग्रस्त १३६ लाख शेतकऱ्यांसाठी २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अलीकडील अवकाळी पावसाचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment