राजरंग : राज चिंचणकर
मुंबई नगरीत साहित्य, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली तब्बल ९० वर्षे कार्यरत असलेली संस्था म्हणजे 'मुंबई मराठी साहित्य संघ'...! या संस्थेचे फक्त नाव जरी घेतले तरी मुंबईच्या साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा गेल्या नऊ दशकांचा काळ रसिकांच्या डोळ्यांसमोरून सरकून जातो. मुंबापुरीतल्या गेल्या तीन ते चार रसिकांच्या पिढ्या गिरगाव स्थित मुंबई मराठी साहित्य संघाच्या वाटचालीच्या साक्षीदार आहेत. साहित्य संघाच्या नावात 'साहित्य' असले, तरी मराठी संगीत नाटकांचे प्रमुख केंद्र म्हणून साहित्य संघाची मुंबईकर नाट्यरसिकांना ओळख आहे. तब्बल पावणेदोनशे वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या मराठी रंगभूमीच्या प्रवाहातल्या अगणित दिग्गज रंगकर्मींची पावले साहित्य संघाच्या रंगमंचाला म्हणजेच साहित्य संघ मंदिराला लागली आहेत. संगीत नाटकांचा सुवर्णकाळ साहित्य संघ मंदिराने पाहिला आहे. केवळ गिरगावकर नाट्यरसिकच नव्हेत; तर अखिल मुंबई आणि महाराष्ट्रातूनही साहित्य संघ मंदिरात पायधूळ झाडणाऱ्या मायबाप रसिकांना मुंबई मराठी साहित्य संघाने भरभरून दिले आहे. साहित्य संघ मंदिर आणि तमाम रसिकजन यांचे गेली नऊ दशके जुळलेले हे अक्षय्य नाते आहे.
सन १९३५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना झाली आणि सन १९३८ पासून इथल्या खुल्या नाट्यगृहात नाट्यप्रयोगांना प्रारंभ झाला. या खुल्या नाट्यगृहात सन १९५२-५३ या काळात एक नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला. तेव्हापासून ही संस्था मुंबईच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचे योगदान देत राहिली आहे. सन १९६४ मध्ये भव्यदिव्य असा नाट्यमहोत्सव साहित्य संघाने आयोजित केला. ८ एप्रिल ते २८ जून अशा मोठ्या कालावधीत पार पडलेल्या या नाट्यमहोत्सवात तब्बल २६ नाटकांचे प्रयोग सादर केले गेले. या प्रयोगाच्या सोबत, प्रख्यात गायक भीमसेन जोशी व कुमार गंधर्व यांचे गायन आणि ख्यातनाम सतारवादक रविशंकर यांच्या मैफिलीही मुंबईकरांनी अनुभवल्या. मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी प्रतिबिंबित झालेल्या 'एकच प्याला', 'स्वयंवर', 'होनाजी बाळा', 'भाऊबंदकी', 'अंमलदार', 'पंडितराज जगन्नाथ', 'कुलवधू', 'मंदारमाला' या आणि अशा असंख्य नावाजलेल्या नाटकांचे प्रयोग साहित्य संघ मंदिरात त्यावेळी मोठ्या उत्साहात रंगले आणि या नाट्यमहोत्सवाची आठवण मुंबईकरांच्या मनांत कायमची कोरली गेली. त्यानंतरच्या काळात या नाट्यगृहात सादर झालेले मराठी रंगभूमीवरच्या दिग्गज रंगकर्मींच्या नाटकांचे अगणित प्रयोग, रसिकजनांनी मर्मबंधातली ठेव म्हणून जपून ठेवले आहेत.
डॉ. अ. ना. भालेराव आणि डॉ. बाळ भालेराव यांचे मुंबई मराठी साहित्य संघाच्या जडणघडणीत बहुमोल योगदान आहे. गेल्याच आठवड्यात डॉ. बाळ भालेराव यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण साहित्य संघ मंदिराच्या प्रवेशद्वारी करण्यात आले आणि त्यानिमित्ताने साहित्य संघाच्या वास्तूत तमाम साहित्य आणि नाट्यरसिक एकत्र आले. साहित्य संघाच्या अंतरंगाशी गेली अनेक वर्षे एकजीव झालेल्या लेखिका अचला जोशी यांच्या संकल्पनेतून डॉ. बाळ भालेराव यांच्या अर्धपुतळ्याची साहित्य संघाच्या वास्तूमध्ये स्थापना झाली. मुंबई मराठी साहित्य संघाप्रमाणेच महाराष्ट्रात या क्षेत्राशी संबंधित आघाडीच्या साहित्य संस्था कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या शीर्षकांमध्ये नसलेला एक शब्द साहित्य संघाच्या नावात आहे आणि तो म्हणजे 'मराठी'...! हाच संदर्भ धरून, याप्रसंगी रंगमंचावरून विचार व्यक्त झाले आणि साहित्य संघाच्या प्रांगणात मराठीचे चांदणे पसरले.
मधल्या काही काळात या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग कमी होत होते; परंतु आता साहित्य संघ मंदिरात नवनवीन मराठी नाटकांचे प्रयोग जोमाने लागत असल्याचे चित्र आहे. डॉ. बाळ भालेराव यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण प्रसंगाच्या निमित्ताने मुंबई मराठी साहित्य संघाची वास्तू नव्याने झळाळून उठली आणि या वास्तूनेही तिच्या गतवैभवाची नव्याने उजळणी केली. यानिमित्ताने साहित्य संघाशी संबंधित असलेल्या जुन्याजाणत्या रसिकजनांसह, सध्याच्या पिढीतल्या साहित्य व नाट्यरसिकांनी साहित्य संघ मंदिर फुलून गेले. मुंबई शहराचे वैभव म्हणून ओळख असलेली मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था आणि साहित्य संघ मंदिर यांचे स्थान मुंबईकरांच्या मनात अढळ आहे. मुंबईतले जुनेजाणते नाट्यरसिक आजही साहित्य संघाच्या आठवणीत रमत, नवीन पिढीलाही या संस्थेची महती सांगत आहेत. गिरगावातला मराठी टक्का कमी झाला असल्याचे बोलले जात असले, तरी मुंबई मराठी साहित्य संघाची वास्तू मात्र आजही घट्ट पाय रोवून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपत उभी आहे.






