Thursday, April 16, 2026

Kishori Pednekar : महापौरांचा सन्मान ते बाळासाहेबांचा अवमान

Kishori Pednekar : महापौरांचा सन्मान ते बाळासाहेबांचा अवमान

- विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या बाळासाहेबांबद्दल काय आक्षेपार्ह बोलल्या

मुंबइ (विशेष प्रतिनिधी)

मुंबईच्या महापौरांचा सन्मान राखला जात नसल्याने निर्माण झालेल्या मुद्दयावरून थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच अवमान करण्याचा प्रयत्न महापालिका सभागृहात झाला. महापालिकेच्या विरोध पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना उद्देशून 'तुम्ही काय बाळासाहेबांना विकत घेतले आहे का 'असे उद्गार काढले. यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि त्यांनी माफी मागण्ण्यासाठी प्रथम दहा मिनिटांकरता सभागृहाचे कामकाज तहकूब झाले, आणि त्यानंतरही त्यांनी माफी न मागितल्याने दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मुंबई महापालिका सभागृहात सध्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली असून गुरुवारी या सभेला सुरुवात झाल्यानंतर माजी महापौर विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे महापालिका प्रशासनाकडून महापौरांचा सन्मान राखला जात असल्याचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. स्वरसम्रागी आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी महापौरांना दुसऱ्या रांगेत बसवले गेले. त्यामुळे हा मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा अवमान असल्याचे सांगत त्यांनी याचा निषेध व्यक्त केला. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी या त्यांच्या मुद्दयाशी सहमती दर्शवत यापुढे महापौरांसह सर्वच अध्यक्षांची नावे ही पोलिस आयुक्तांकडे पाठवण्यात यावी, अशी सूचना केली. मात्र, याला पाठिंबा देताना, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार असून आम्ही विरोधाला विरोध करत नाही. बाळासाहेबांना काय तुम्ही विकत घेतले काय? बाळासाहेबांचे विचार कुणी विकत घेवू शकत नाही, बाळासाहेबांना कुणी विकत घेवू शकत नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत बाळासाहेबांना विकत घेणे याचा अर्थ काय अशी विचारणा करत या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. यावर शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी बाळासाहेबांना कुणी विकत घेवू शकत नाही आणि कुणामध्ये ही ताकदही नसल्याचे सांगत बाळासाहेब हे आम्ही सर्वांसाठी दैवत असल्याचे सांगितले.

त्यामुळे अखेर महापौर रितू तावडे यांनी, विरोधी पक्षनेत्यांचे हे आक्षेपार्ह शब्द असल्यामुळे त्यांनी माफी मागावी आणि यासाठी दहा मिनिटांकरता सभेेचे कामकाज तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु दहा मिनिटांनंतर सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी विरोधी पक्षनेत्यांचे हे विधान सभागृहातील सर्व नगसेवकांना मान खाली घालायला लावणारे आहे.आम्हीही कधी बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोललो नाही आणि बोललो असेल तर तुमची चप्पल आमचे गाल असतील. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मी असे वक्तव्य केलेच नाही. महापालिका सचिवांनी याची नोंद घेतली आहे त्याची माहिती द्यावी,अशी मागणी केली. आम्ही बाळासाहेबांच्या मुशीत घडलो असून आम्ही त्यांचेच आहोत. त्यामुळे मी अपमान केलेला नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर महापौर रितू तावडे यांनी मी स्वत: हे विधान ऐकले असून महापालिका सचिवांनाही विचारुन घेतले. त्यांनीही हे मान्य केले. बाळासाहेबांना विकत घेतले का असे त्यांनी विधान केले असून हे अत्यंत चुकीचे आहे. त्यातच मी त्यांना सभागृहात बसण्याच्या सूचना करूनही त्या निघून गेल्या हा महापौर आणि सभागृहाचाही अवमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाकडून हा प्रकार अपेक्षित नाही. हे चुकीचे विधान आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असे निर्देश महापौरांनी निर्देश दिले. परंतु त्यानंतरही त्यांनी माफी न मागितल्याने अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आपण मोठ मन करून माफी मागायला हवी. बाळासाहेबांसाठी मी हजारवेळा माफी मागितली असतील. पण आपला जर हटवादी स्वभाव असेल आणि विरोधी पक्षाला आपल्या हटवादी स्वभावानुसार चालवणार असाल तर आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा दिला. त्यानंतरही पेडणेकर आपल्या मतावर ठाम राहिल्यामुळे अखेर प्रभाकर शिंदे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्या आणि वर्तनाचा निषेध करण्यासाठी सभागृहाचे कामकाज पूर्णवेळ तहकूब करण्याची सूचना केली. याला सत्ताधारी पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे अखेर महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. यावेळी झालेल्या चर्चेत श्रध्दा जाधव, अमेय घोले,दिक्षा कारकर, नवनाथ बन,अश्रफ आझमी, तृष्णा विश्वासराव आदींनी चर्चेत भाग घेतला.

सभागृहात दोन्ही बाजुंनी घोषणा :

बाळासाहेबांचा अवमान केल्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून माफी मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विजय असो, माफी मागा.. माफी मागा.. किशोरीताई माफी मागा अशा घोषणा विरोधी पक्षांकडून केल्या जात होत्या, तर उबाठाकडूनही प्रत्युत्तरादाखल घोषणा दिल्या गेल्यामुळे सभागृहातील वातावरण तापले गेले होते. त्यातच स्वीकृत नगरसेवक उमेश माने यांच्या भाषणानंतर स्वीकृत की विकृत अशाप्रकारचे विधान उबाठाकडून झाल्यामुळे शिवसेना आणि उबाठाच्या नगरसेवकांमध्ये चांगली शाब्दीक चकमक झाली होती. यावेळी महापौरांनी उबाठाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांना चांगलीच समज दिली.

विरोधी पक्षनेत्या खोटारड्या : 

उपमहापौर संजय घाडी यांनी विरोधी पक्षनेत्या या खोटारड्या असल्याचे सांगत त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले हे सभागृहातील सर्वच नगरसेवकांनी आणि उपस्थित अधिकारी तसेच पत्रकारांनी ऐकले आहे. महापालिकेचे सभागृह ऐतिहासिक असून यापुढे अशाप्रकारचे प्रकार घडल्यानंतर त्यांना खोटे ठरवण्याचा जो प्रकार सुर आहे त्याकरता महापालिका सभागृहाच्या कामकाजाचे रेकॉर्डींग केले जावे अशी मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment