मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशवंत विद्यार्थ्यांचा मुंबईच्या महापौर रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुरुवारी १६ एप्रिल २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात सत्कार केला. यासह महानगरपालिकेच्या सभागृहानेही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळांचा एकूण निकाल ९२.८९ टक्के इतका लागला आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मिठागर सीबीएसई शाळेतील आर्या लामने (९७.८ टक्के) हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पूनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के), राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के), पूनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) आणि श्रेया सिंग (९६.४ टक्के), मिठागर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनीही सर्वाधिक गुण मिळविले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयात शंभर गुण मिळविले आहेत. कौतुकाची बाब म्हणजे मराठी विषयात शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अ मराठी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. महानगरपालिका सातत्याने मराठीच्या संवर्धनासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे हे यश असल्याचे यातून दिसून येते.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर दालनात महापौर रितू तावडे यांनी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला. महापौर रितू तावडे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षण विभागाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नगरसेवक प्रकाश दरेकर, नगरसेविका राखी जाधव, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी देखील आयुक्त दालनात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी ममता राव, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. तसेच महानगरपालिका सभागृहानेही या यशवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, पालकांचे व शिक्षण विभागाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. सभागृहात या अभिनंदनासाठी सभागृह नेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी निवेदन केले. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनीही अभिनंदनपर निवेदन केले. सभागृहात सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी बाके वाजवून, यशवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दालनातही या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.






