Thursday, April 16, 2026

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

Mumbai Water Cut : मुंबईवर पाणी संकटाची टांगती तलवार; १ मेपासून १०% पाणी कपात होणार ?

मुंबई : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यंदा सुमारे ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले असून पाणीटंचाई टाळण्यासाठी १ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा साधारणपणे ७ जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून पाणीसाठ्यात घट होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दररोज मोडक सागर, तानसा, भातसा, वैतरणा यांसारख्या सात धरणांतून मुंबईला सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहराला वर्षभरासाठी १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेता ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.

१५ एप्रिल २०२६ रोजी धरणांतील पाणीसाठा:

भातसा : २,३५,४३९ दशलक्ष लिटर (सर्वाधिक) मध्य वैतरणा : ६९,१०६ अप्पर वैतरणा : ७७,०४५ तानसा : ४०,८१७ मोडक सागर : ४५,३४० विहार : १५,३५३ तुळशी : ३,२७४

गेल्या तीन वर्षांची तुलना:

२०२६ : ३३.६०% २०२५ : ३०.२४% २०२४ : २४.५४%

राज्य सरकारच्या सूचनेनुसार यंदा जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे १ मेपासून पाणी कपात लागू केल्यासच अखंडित पाणीपुरवठा राखता येईल, असे पालिका प्रशासनाचे मत आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज भासणार असून संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागली आहे.

Comments
Add Comment