Japanese encephalitis : जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होती. याच दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले. मात्र, महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली नव्हती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यावेळी केंद्र सरकाराला विशेष विनंती केली आणि जपानी मेंदूज्वर आजारांवरील लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे आज रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.



जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका


महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरण व नियंत्रण उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. हा आजार प्रामुख्याने डासांद्वारे पसरतो आणि मेंदूवर परिणाम करून गंभीर गुंतागुंत, झटके तसेच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करतो. या आजाराचा मृत्यूदर जास्त असून वाचलेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.



राज्यातील सद्यस्थिती


राज्यात २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकरणे आढळली आहेत. २०२२ मध्ये २ रुग्ण, २०२३ मध्ये ५ रुग्ण, २०२४ मध्ये ५ रुग्ण व २ मृत्यू, २०२५ मध्ये ७ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आले, तर २०२६ च्या मार्चपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रुग्ण आढळले आहेत.



लसीकरण मोहिमेची प्रगती


एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान लसीकरण मोहिमेत राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पहिल्या डोसचे एकूण कव्हरेज ८९.२६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ७८.६८ टक्के आहे. धाराशिव (९९.५९ टक्के), लातूर (९७.८४ टक्के) आणि सोलापूर (९५ टक्के पेक्षा जास्त) जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र रायगड ५५ टक्के पहिला डोस व ४८ टक्के दुसरा डोस, पुणे आणि पीसीएमसी भागात दुसऱ्या डोसचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.



निदान व उपचार सुविधा


राज्यात जपानी मेंदूज्वराच्या निदानासाठी नागपूर, गडचिरोली, सेवाग्राम (वर्धा), भंडारा आणि गोंदिया येथे पाच सेंटीनेल केंद्रे कार्यरत आहेत. तसेच १६ जिल्ह्यांमध्ये बाल अतिदक्षता विभाग (PICU) सुरू असून रुग्णांना आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.



विदर्भ भाग सर्वाधिक संवेदनशील


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भ हा जपानी मेंदूज्वरासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात डासांची वाढ, तसेच डुक्कर व पक्ष्यांच्या संपर्कामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. काही शहरी व उपनगरी भागातही साथीचा धोका संभवतो.



नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना


राज्यात नियमित लसीकरण, विशेष मोहिमा, रक्त नमुना तपासणी, डास नियंत्रणासाठी धूरफवारणी, क्यूलेक्स डासांचे सर्वेक्षण, जनजागृती, डासांच्या उत्पत्तीस्थळांवर गप्पी मासे सोडणे तसेच स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.



जनतेला आवाहन


जपानी मेंदूज्वर हा आजार विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, डासांपासून संरक्षण करावे आणि ताप किंवा मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त