मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत कॅब व रिक्षा चालकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्यास शनिवार १८ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा कॅब चालकांनी दिला आहे. ॲप आधारित कॅब सेवांच्या मनमानी कारभाराविरोधात राज्यभरातील चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सींसाठी निश्चित केलेले मीटर दर ॲपमध्ये लागू करण्याच्या मागणीसाठी १० एप्रिल रोजी चालकांनी पुणे – मंत्रालयादरम्यान पदयात्रा सुरू केली. पदयात्रा मंगळवारी अंधेरी विमानतळ परिसरात पोहोचली. बुधवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्याशी भारतीय गिग कामगार मंच आणि रिक्षा व कॅब चालकांची बैठक झाली. बैठकीत पुणे ते मुंबई पदयात्रा करणाऱ्या कॅब चालकांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या. तसेच चालकांच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.






