Tuesday, April 14, 2026

Jyotiba Temple Development Plan : जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याला ‘सुप्रमा’

Jyotiba Temple Development Plan : जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याला ‘सुप्रमा’

२५२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा; ऐतिहासिक वारसा जपत पायाभूत सुविधांचे जाळे तयार करणार

मुंबई : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना राज्य सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. या निर्णयामुळे दुसऱ्या टप्प्यातील १७० कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांसह एकूण २५२ कोटी ९ लाख रुपयांच्या विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) नुकताच निर्गमित केला असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत ही कामे तातडीने मार्गी लागणार आहेत.

श्री जोतिबा डोंगराचे धार्मिक महत्त्व आणि दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता, या परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी हा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने भाविकांची सुलभता, पर्यावरण रक्षण आणि ऐतिहासिक वारशाचे जतन यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २० कोटी २१ लाख रुपये खर्चून डोंगरावरील जुन्या पायवाटांची डागडुजी व रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच, जोतिबा मंदिराच्या मुख्य यात्रा ठिकाणचे (सेंट्रल प्लाझा) दुरुस्ती व विस्तारीकरण करण्यासाठी १६ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सीसीटीव्ही नियंत्रण केंद्र, पोलीस कक्ष आणि देवस्थान व्यवस्थापन कार्यालयाची उभारणी केली जाईल. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने शाहूकालीन ‘हुजुरवाडा’ इमारतीचे संवर्धन करून तिथे पुरातन दस्ताऐवज माहिती केंद्र उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, देवाच्या मानाच्या अश्वासाठी आणि उंटासाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्थाही या प्रकल्पात समाविष्ट आहे.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठा निधी

डोंगरावरील पायाभूत सुविधांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी १५ कोटी ३ लाख रुपये, तर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी ७४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ५ मेगावॅटचे सब-स्टेशन व सोलर प्लांट उभारण्यात येईल. भाविकांच्या निवासासाठी कम्युनिटी हॉल, प्राथमिक आरोग्य केंद्र, अन्नछत्र आणि वाहनतळांची सुविधाही विकसित केली जाणार आहे. कुशिरे ते गायमुख तलाव या पादचारी मार्गाचा विकास आणि श्री यमाईदेवी मंदिर परिसरातील सुविधा केंद्रांमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. वृक्षारोपणासह बाधित वृक्षांच्या पुनर्रोपणासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा