नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असून कुंभमेळ्याची दिशा ठरवणारी आहे. तसेच कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव असल्याचे मंत्री भुजबळ यांनी म्हटले.
'नाशिक हे आध्यात्मिक सनातन परंपरेचे केंद्र'
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "नाशिक हे फक्त ऐतिहासिक शहर नाही तर आध्यात्मिक सनातन परंपरेचे एक केंद्र आहे. गोदावरीच्या तीरावर हे शहर वसलेले आहे. तसेच संत परंपरेची विरासत या शहराला लाभलेले आहे. त्र्यंबकेश्वर येथे शैव साधू महंत जातात. मात्र प्रयागसारखी जागा याठिकाणी नाही. ती उपलब्ध करण्याचे काम आमचे सुरू आहे."
'राष्ट्रीय एकात्मिकतेचा उत्सव'
पुढे बोलताना, कुंभमेळा हा भारताचा अध्यात्मिक मेळा आहे. करोडो लोक एकत्र येतात ते कसे राहतात याचा अभ्यास करण्यासाठी लोक बाहेरच्या देशातून येतात. ही तयारी फक्त प्रशासनाची नाही तर भाविक आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्वाची आहे. नाशिकमध्ये वर्षभर लोक येतात कारण याठिकाणी अनेक धार्मिक विधी होतात. भारतात सर्वात जास्त धार्मिक कार्यक्रमात लोक एकत्र येतात ते फक्त कुंभमेळ्यात. त्यामुळे हा राष्ट्रीय एकात्मिकतेचा उत्सव असल्याचे मंत्री भुजबळ यांनी म्हटले.
'गोदावरी नदी ही शुद्ध हवी, तिचे तीर्थ लोक घरी नेतात'
मंत्री छगन भुजबळ म्हटले की, "नाशिकमध्ये शैव वैष्णव वारकरी आणि सनातन परंपरा याचे महापर्व होणार आहे. संत समाज या अध्यात्मकतेचे केंद्र आहे. संत महंत यांची भूमिका फार महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा देशात आपत्ती आली तेव्हा संतानी या देशाला दिशा दाखवलेली आहे. संत समाजाची भूमिका प्रतिकात्मक नाही तर दिशादर्शक राहणार आहे. गोदावरी नदी ही शुद्ध हवी, तिचे तीर्थ लोक घरी नेतात मात्र काही लोकांनी त्यावर ध्यान नाही दिले. मात्र ती शुद्ध झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. रस्ते करा, सर्व करा पण सर्वात अगोदर गोदावरीचे पाणी निर्मळ करा. "
'२८ हजार कोटींची काम सुरू'
पुढे बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी काम करत आहे. जे काम सुरू आहे ते वेळेत पूर्ण करण्याचे काम करायचे आहे. नाशिक शहर सुंदर झाले पाहिजे. प्रभू रामाने या ठिकाणी १४ वर्ष घालवली. कारण इथले वातावरण शुद्ध आहे. २८ हजार कोटींची काम सुरू आहेत. नवीन घाटांची निर्मिती केली जात आहे. साधुग्राम पार्किंग रस्ते काम सुरू आहे. तसेच मोठ्या प्रमाणात काम केली जात आहेत. सरकारसमोर साधू महंत ज्या गोष्टी आपण ठेवल्यात त्या दृष्टीने आम्ही काम करू फक्त आपला आशीर्वाद राहू द्या"