वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन


नागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज येथे केले.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था, आयआयएम नागपूर आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने व्हीएनआयटी येथे ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राचे विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मेत्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे, व्हीएनआयटीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मदाभूशी मदन गोपाल, संचालक डॉ. प्रेमलाल पटेल, लघु उद्योग भारतीचे रवनीत खुराना या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज जग अत्यंत वेगाने पुढे जात आहे. पहिली औद्योगिक क्रांती 1760 मध्ये आली होती. त्यानंतरच्या आलेल्या तीन औद्योगिक क्रांतींचा काळ हा सुमारे अडीचशे वर्षांचा आहे. मात्र, मागील पंधरा वर्षांतच तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहे. बदलांची गती लक्षात घेतली नाही, तर आम्ही मागे राहू शकतो. या क्रांतीला गती देणारे ‘एआय’आणि ‘डीप टेक्नॉलॉजी’च्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. आम्हाला शैक्षणिक धोरणातून असे मानव संसाधन घडवायचे आहे, ज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक व व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहे. भौतिक, नैतिक, शारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावी, अशी अपेक्षा आहे. जागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.


मुख्यमंत्री म्हणाले, साठ टक्के नोकऱ्यांचे स्वरुप येत्या एक हजार दिवसांमध्येच बदलणार आहे. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल, असा याचा अर्थ नाही. देशात संगणक क्रांती आली, त्यावेळीही अशीच चर्चा सुरु झाली होती. मात्र, आम्ही त्या क्षेत्रातही आमचा ठसा उमटविला होता. तंत्रज्ञान कधीच थांबत नाही. अशावेळी तंत्रज्ञानासोबत आपणही पुढे जाण्याची गरज आहे. विद्यापीठे तसेच शिक्षकांनी आजच्या काळात कुठले विषय सुसंगत व अनुरूप आहेत, याचाही विचार करण्याची गरज आहे. पंधरा वर्षात तीन औद्योगिक क्रांती येणार असतील, तर समाजात काहीही स्थायी राहू शकत नाही. प्रत्येकाला नव्या पद्धती स्विकाराव्या लागतील व शैक्षणिक क्षेत्र त्यासाठी अनुकूल करून घ्यावे लागेल आणि ज्ञानाचा प्रवाह पुढे न्यावा लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.


विदेशी विद्यापीठांना आम्ही अनुकूल नव्हतो, असाही एक काळ होता. कारण त्यावेळी आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नव्हतो. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. नवी मुंबईत आम्ही एज्युसिटी विकसित करत आहोत. त्यात अनेक विदेशी विद्यापीठाचे शिक्षण कमी खर्चात घेण्याची संधी आमच्या मुलांना उपलब्ध होणार आहे. आमच्या विद्यापीठांनीही या स्पर्धेत उतरून शिक्षणाचा तो स्तर गाठायला हवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘बेस्ट प्रॅक्टीसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी’ या पुस्तिकेचे प्रकाशनही याप्रसंगी पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर यांनी आभार मानले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील शिक्षण व उद्योग क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातून विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण या थीमवर आधारित महाराष्ट्र ज्ञान सभेचे हे आयोजन होत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन