Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम रखडणे हे कोणत्याही स्थितीत परवडणारे नाही. पुनर्विकास टप्पा एक मधील इमारत उभारणीचे काम पुढील आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे, प्रलंबित असलेल्या परवानगी युद्ध पातळीवर प्रयत्न करून प्राप्त कराव्यात, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना करत महापौरांनी अधिकाऱ्यांना दम भरला.


घाटकोपर (पूर्व) येथील सेठ व्ही.सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ६०० रुग्णशय्या क्षमता असलेली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन गुुरुवारी २ एप्रिल २०२६ रोजी पाहणी केली. नगरसेवक धर्मेश गिरी, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजूलवाला, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता मनोज राणे, एन विभागाचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) मारुती पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.


प्रारंभी माहिती देताना उपप्रमुख अभियंता राणे म्हणाले की, राजावाडी रुग्णालय पुनर्विकास टप्पा एक अंतर्गत उभारण्यात येणारी इमारत ही निम्न तळघर, तळघर, तळमजला अधिक १० मजले या स्वरूपाची राहणार आहे. ६०० रुग्णशय्या क्षमतेच्या या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. यासाठी सुमारे ३३ हजार १७९ चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्रफळ राहणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये टप्पा एक इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. गौण खनिज आणि राडारोडा संदर्भातील परवानगी प्राप्त होताच तत्काळ इमारत उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण रुग्णालय स्थलांतरित केले जाईल आणि पुढील टप्प्यात दुसरी इमारत उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


भूमिपूजन होऊन चार महिने लोटल्यानंतरही प्रत्यक्ष इमारत उभारणी कार्यवाही सुरू न झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नापसंती व्यक्त केली. प्रशासनाला जिथे जिथे अडचणी वाटत असतील, त्या बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. तसेच लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतल्यास अशा अडचणी मार्गी लागू शकतात. आवश्यक सर्व परवानगी प्राप्त करणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी प्रत्यक्ष कामास विलंब होणे खपवून घेणार नाही, अशी सक्त सूचना महापौरांनी केली.


पुढील आठवड्यात इमारत उभारणीचे काम सुरू करावे. इमारत उभारणीचे काम सुरू असताना शेजारी रुग्णालयामध्ये रुग्णांना बांधकामाचा आवाज, धूळ आदींचा त्रास होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. कामाच्या प्रत्येक टप्प्यात घाटकोपर परिसरातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्याने माहिती द्यावी. रुग्णालय पुनर्विकास संदर्भात महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त सभेमध्ये सविस्तर सादरीकरण करावे, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न