मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) विभागात पुढील दोन दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या बदलामागे दक्षिण कर्नाटक भागात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कारणीभूत आहे. तसेच उत्तर ओडिशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाहात खंड पडल्यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे वातावरण अस्थिर झाले असून पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, शहरातील तापमानातही चढ-उतार दिसून येत आहेत, ज्यामुळे वातावरण अधिक दमट आणि अस्थिर झाले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन केले आहे.