दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याना मदतीची रक्कम जाहीर
मुंबई : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान सोसाव्या लागलेल्या पशुपालकांसाठी राज्य सरकारने मदतीचा नवा आणि सर्वसमावेशक आराखडा जाहीर केला आहे. यापूर्वी मदतीसाठी असलेल्या जाचक अटींमध्ये महत्त्वाचे बदल करून आता 'सरसकट मदत' देण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या जनावरांच्या संख्येवर लावलेली मर्यादेची अट आता शिथिल करण्यात आली असून, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या सर्व जनावरांच्या नुकसानीपोटी सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे यापूर्वी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेकडो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ मृत जनावरांसाठीच नव्हे, तर पावसाने कोसळलेल्या किंवा नुकसान झालेल्या गोठ्यांच्या दुरुस्तीसाठीही विशेष मदतीची तरतूद करण्यात आली आहे. नियमातील या ऐतिहासिक बदलामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियमात केले हे महत्त्वाचे बदल
आता केवळ अल्प किंवा अत्यल्प भूधारकच नव्हे, तर सर्व आपदग्रस्त पशुपालक आणि भूमिहीन शेतकरीही मदतीसाठी पात्र ठरतील.
पूर्वी असलेल्या जनावरांच्या संख्येच्या मर्यादा (उदा. ३ किंवा ६ जनावरे) आता पूर्णपणे हटवण्यात आल्या आहेत.
केवळ मृतच नव्हे, तर पुरात वाहून गेलेली किंवा बेपत्ता झालेली सर्व जनावरे आता मदतीसाठी पात्र धरली जातील.
पोल्ट्रीसाठी असलेली १० हजार रुपयांची जुनी मर्यादा काढून आता सर्व मृत पक्षांसाठी भरपाई दिली जाईल.
अशी मिळणार पशुपालकांना मदत
१. मोठ्या आणि दुधाळ जनावरांसाठी:
मोठी दुधाळ जनावरे: प्रति जनावर ३७,५०० रुपये.
ओढकाम करणारी मोठी जनावरे: प्रति जनावर ३२,००० रुपये.
२. लहान आणि इतर जनावरांसाठी:
लहान दुधाळ जनावरे: प्रति जनावर २०,००० रुपये.
शेळी किंवा मेंढी: प्रति जनावर ४,००० रुपये.
३. कुक्कुटपालन आणि गोठा नुकसान:
कुक्कुटपालन (कोंबड्या): प्रति पक्षी १०० रुपये.
पडझड किंवा पूर्णतः नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी ३,००० रुपये.