मुंबई : कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडली. घराबाहेर आल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यावर टीका केली. माझ्यासोबत भेदभाव झाला आणि मला माझी बाजू मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी नाराजी तिने व्यक्त केली.
रुचिताच्या या वक्तव्यांवर आता ‘बिग बॉस मराठी ५’ ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत जान्हवीने बिग बॉस आणि रितेश देशमुख यांच्याविरोधात बोलणाऱ्या स्पर्धकांवर निशाणा साधला. “ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्र का करताय?” अशा शब्दांत तिने रुचिताला सुनावले.
काय म्हणाली जान्हवी ?
जान्हवीने व्हिडिओमध्ये सांगितले की, महाराष्ट्रात अनेक कंटेंट क्रिएटर्स, अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर्स बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. “बिग बॉस हा खूप मोठा शो आहे आणि त्या घरात जाण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात. अशा मोठ्या मंचावर संधी मिळाल्यानंतर त्या शोबद्दल वाईट बोलणं योग्य नाही,” असे ती म्हणाली.
पुढे थेट रुचिताचे नाव घेत जान्हवी म्हणाली, “बिग बॉस पक्षपाती आहेत किंवा रितेश देशमुख पक्षपाती आहेत, असं बोलणं चुकीचं आहे. त्या शोने तुम्हाला संधी दिली, ओळख दिली. त्यामुळे त्या मंचाचा आदर ठेवायला हवा.”
View this post on Instagram
तिने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, बिग बॉसच्या घरात असताना चुका होतात, गेम बदलतो, रागही येतो. “मीसुद्धा अनेक चुका केल्या. वीकेंडच्या वाराला मला बोलूही दिलं नाही, कधी ओरडाही मिळाला. तरी मी कधीही शोला किंवा रितेश सरांना दोष दिला नाही,” असे ती म्हणाली.
शेवटी जान्हवीने स्पष्ट इशारा देत म्हटले की, “माझ्यासाठी बिग बॉस हा देवासारखा शो आहे. या शोमुळे मला महाराष्ट्रात ओळख मिळाली. त्यामुळे कोणालाही या शोविरोधात किंवा रितेश देशमुखांविरोधात बोलणं मी सहन करणार नाही.”






