कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची झंझावाती खेळी साकारून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या खेळीसह संजू टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जगातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. : संजू सॅमसनने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य व फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो शाहिद आफ्रिदी व विराट कोहली याच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला. शिवाय फायनलमध्ये ८९ धावांची खेळी करून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.
या ऐतिहासिक सामन्यात संजू सॅमसनने सुरुवातीला अवघ्या ३३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर अतिशय संयत व आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. संजू आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना ८९ धावांवर बाद झाला. मात्र, या धावांच्या जोरावर त्याने २०१४ च्या विश्वचषक फायनलमध्ये विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ७७ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. आता भारतासाठी विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान संजू सॅमसनच्या नावे जमा झाला आहे.
संजू सॅमसन केवळ भारताचाच नव्हे, तर जागतिक स्तरावर टी-२० विश्वचषक फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सचा (८५* धावा, विरुद्ध इंग्लंड) आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा (८५ धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया) विक्रम मोडीत काढला आहे. संजू सॅमसनने आपल्या ४६ चेंडूंच्या या खेळीत ८ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार मारले. १९३.४८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे निस्तेज केले. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताने विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
संजू सॅमसनने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतकांची हॅट्रिक केली आहे. याआधी १ मार्चला कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात संजूने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. तर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात संजूने ४२ चेंडूत ८९ धावांची खेळी केली होती. आता न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात संजूकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. यासह तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतकांची हॅट्रिक करणारा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल या यादीत अव्वल स्थानी आहे. केएल राहुलने २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली होती. या स्पर्धेत केएल राहुलने अफगाणिस्तानविरूद्ध खेळताना ६९ धावांची खेळी केली होती. तर स्कॉटलंडविरूद्ध खेळताना त्याने ५० धावा केल्या होत्या. तर नामिबियाविरूद्ध खेळताना त्याने नाबाद ५४ धावांची खेळी केली होती. विराट कोहलीच्या नावे देखील लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. पण त्याने हा कारनामा २ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मिळून केला होता. विराटने २०१६ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात ८२ धावांची खेळी केली होती. तर वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५७ धावांची खेळी केली होती. तर २०२१ टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात विराटने पाकिस्तानविरूद्ध खेळताना ५७ धावांची खेळी केली होती.
टी-२० विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:
८९ संजू सॅमसन न्यूझीलंड
८५* मार्लन सॅम्युअल्स इंग्लंड
८५ केन विल्यमसन ऑस्ट्रेलिया
७८ मार्लन सॅम्युअल्स श्रीलंका
७७* मिचेल मार्श न्यूझीलंड







