Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी वन्यजीव संवर्धन योजनेची अंमलबजावणी; वन विभागाकडे २० कोटी रुपये करणार जमा

गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी वन्यजीव संवर्धन योजनेची अंमलबजावणी; वन विभागाकडे २० कोटी रुपये करणार जमा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बोगद्याचे काम सुरू आहे. वन विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या या राष्ट्रीय उद्यानातून या बोगद्याचे काम केले जाणार असल्यामुळे एकूण प्रकल्प खर्चाच्या एक टक्का रक्कम म्हणून २०कोटी रुपये संबंधित विभागाला अदा केले जाणार आहेत. वन विभागाच्या अटींची पूर्तता करण्याच्या दृटीकोनात ही रक्कम देण्यात येत आहे.

गोरेगाव येथील फिल्मसिटीपासून मुलुंडपर्यंत जाणाऱ्या या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सुमारे ५.३० कि.मी. लांबीचा जोड बोगदा टीबीएम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केला जात आहे. तसेच चित्रनगरी परिसरात सुमारे १.३२ कि.मी. लांबीचा पेटी बोगदा आणि त्यासोबतचे जोडरस्ते उभारण्याचे कामही या प्रकल्पात समाविष्ट आहे.

या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येऊन नोव्हेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. हे काम ऑक्टोबर २०२८ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत या बोगद्याच्या प्रस्तावाला काही अटी व शर्तींसह मंजुरी दिली होती. त्या अटींनुसार संरक्षित क्षेत्रात मानवी–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विशेष योजना तसेच वन्यजीव संवर्धनासाठी स्वतंत्र योजना तयार करणे आवश्यक असल्याचे नमुद केले होते.

त्या अनुषंगाने राज्याचे मुख्य वनसंरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच तुंगारेश्वर अभयारण्य परिसरासाठी मानवी–वन्यजीव संघर्ष निवारण आणि वन्यजीव संवर्धन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प खर्चाच्या १ टक्के रक्कम मुख्य वनसंरक्षक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक यांच्याकडे जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याअंतर्गत २० कोटी रुपये वन विभागाला अदा केले जाणार आहेत. या निर्णयामुळे गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कामे पुढे नेण्याबरोबरच वन्यजीव संरक्षणालाही चालना मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment