फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणारा सामना फक्त विजेतेपदासाठीच नाही, तर अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. गतविजेता म्हणून टीम इंडिया स्पर्धेत दमदार दिसत असली तरी, तिला चार अशी आकडेवारी उलटवावी लागणार आहेत ज्यांचा भंग अद्याप कोणत्याही संघाला जमलेला नाही. या चार अडचणींवर मात करून भारत ट्रॉफी उंचावू शकेल का, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.


सर्वप्रथम, सलग दोन वेळा चषक जिंकण्याचा विक्रम अद्याप कोणत्याही संघाने प्रस्थापित केलेला नाही. आतापर्यंत नऊ हंगाम झाले, तरीही वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारताने प्रत्येकी दोन-दोन वेळा जेतेपद मिळवले असले तरी एका हंगामानंतर दुसऱ्या हंगामात विजय मिळवता आला नाही. २०२४ चा चषक जिंकणारा भारत यावेळी गतविजेता म्हणून उतरला आहे. त्यामुळे रविवारी विजय मिळवला तर हा दीर्घकाळचा शाप संपुष्टात येईल. दुसरा मोठा प्रश्न आहे घरच्या मैदानावरील यशाचा. टी-२० विश्वचषकाच्या दहा हंगामांमध्ये अद्याप एकाही यजमान संघाने अंतिम सामना जिंकला नाही. २०१२ मध्ये श्रीलंकेने आपल्या घरच्या मैदानावर फायनल गाठली होती, पण वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी भारत हा दुसरा यजमान संघ आहे जो अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने घरच्या मैदानावर चषक जिंकून हा शाप मोडला होता. आता टी-२० मध्येही तोच इतिहास घडवण्याची संधी आहे.


तिसरा शाप रविवारच्या दिवसाशी संबंधित आहे. भारताने आतापर्यंत चार विश्वचषक जिंकले आहेत. दोन एकदिवसीय व दोन टी-२०. रविवारी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकण्याची बाब भारताच्या नशिबात अद्याप आलेली नाही. १९८३ व २०११ चे एकदिवसीय चषक शनिवारी जिंकले, २०२४ चा टी-२० विश्वचषकही शनिवारीच उंचावला, तर २००७ चा टी-२० चषक सोमवारी जिंकला. याउलट, एक टी-२० व एक एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी गमावल्याची नोंद आहे.


सर्वांत कठीण आव्हान आहे न्यूझीलंडविरुद्धचे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही. दोन्ही संघ आतापर्यंत तीन वेळा आमने-सामने आले आणि तिन्ही वेळा न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला-२००७, २०१६ आणि २०२१ च्या स्पर्धांमध्ये. त्यामुळे फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवणे हे केवळ विजेतेपदासाठीच नव्हे तर ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही आवश्यक आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा टी-२० विश्वचषकातील फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे, तर नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे.


स्पर्धेच्या तिकिटांसह विमानसेवाही महागली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या महामुकाबल्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू झाला आहे. मूळ किंमत २,००० रुपये असलेल्या तिकिटांची विक्री सोशल मीडियावरून १० ते १५ हजार रुपयांना केली जात आहे. तर अतिशय आलिशान मानल्या जाणाऱ्या 'प्रेसिडेंट गॅलरी'च्या तिकिटांची किंमत १.५० लाख रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. प्रमुख महानगरांमधून अहमदाबादला जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून, विमान कंपन्यांनी परतीच्या प्रवासाच्या दरात तब्बल २०० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे विमानभाडे सामान्यतः ४,५०० ते ६,००० रुपयांच्या दरम्यान असते. मात्र, ७ मार्चच्या प्रवासासाठी हे दर १६,५८५ रुपयांवर पोहोचले आहेत, तर ९ मार्चच्या परतीच्या प्रवासासाठी १६,९०० रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईहून सकाळी १० वाजता सुटणाऱ्या विमानाचे तिकीट तर चक्क ३३,०७१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशीच स्थिती चेन्नई आणि दिल्ली येथे असून, तेथून अहमदाबादसाठी अनुक्रमे १८, २१ ते ३३ हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत.


विजेत्याला मिळणार तब्बल ‘२७.५०’ कोटींचे बक्षीस : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. आयसीसीकडून टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी एकूण १३.५ मिलियन डॉलर्स (१२३.७७ कोटी) बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील बक्षिसेच्या रकमेच्या तुलनेत २० टक्के अधिक आहे. गेल्यावेळी बक्षिसाची रक्कम ही ११.२५ मिलियन डॉलर्स इतकी होती. या स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेत भारतीय संघाला बक्षीस म्हणून २.४५ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळाली होती. तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला बक्षीस म्हणून १.२८ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळाली होती.


उपविजेत्या संघाला मिळणार १४.६७ कोटी : आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ मिलियन डॉलर्स म्हणजे २७.५० कोटी इतकी रक्कम दिली जाणार आहे. तर निर्णायक सामना गमावणाऱ्या उपविजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजे १४.६७ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला ०.७९ मिलियन डॉलर्स म्हणजेच ७.२४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या उप विजेत्या संघासह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला रक्कम दिली जाणार आहे. या स्पर्धेतील ५ ते १२ व्या स्थानी असलेल्या संघांना देखील ०.३८ मिलियन डॉलर्स म्हणजे ३.४८ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

Comments
Add Comment

U18 Asia Cup : U18 आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय

पुरुषांची सुवर्ण तर महिलांची कांस्यवर मोहोर काकामिगाहारा : भारतीय युवा हॉकीसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.

Women's Under-18 Hockey : भारतीय महिला संघाची कांस्यपदकावर मोहोर

काकामिगाहारा : भारतीय महिला अंडर-१८ हॉकी संघाने महिला १८-वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करत

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम

IND vs AFG : गिल-राहुलच्या शतकांनी अफगाणिस्तानवर भारताची पकड मजबूत;पहिल्याच दिवशी 368/3

न्यू चंदीगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर टीम इंडियाचेच वर्चस्व

Ind vs Afg :टीम इंडियाला मोठा धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहली बाहेर;यशस्वी जयस्वाल संधी !

मुंबई : अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

FIFA WORLD CUP 2026 :फिफा विश्वचषक २०२६; लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो यांच्या 'लास्ट डान्स'ची रंगणार थरारक लढत!

FIFA WORLD CUP 2026 : प्रतीक्षा आता संपली आहे! कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या देशांमध्ये ११ जूनपासून सुरू होणाऱ्या २०२६ फिफा