राज्यातील ९ लाख ८४ हजार पेक्षा अधिक मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण लस

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत तीन महिन्यात राज्यातील ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.


गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ होत असून, १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या वयोगटातील मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.


भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात व ४२ हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.


या लसीकरण मोहिमेचे महत्त्व विशद करताना आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भाशयमुख कर्करोग हा वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यास टाळता येणारा आजार आहे. जागतिक स्तरावर या कर्करोगाचे निदान उशिरा झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते, मात्र किशोरवयातच दिलेली ही लस शरीरात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर देखील जनजागृती करण्यात येत असून, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन केले जाते.



३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक


लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होतात.



आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव


जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्व, बाल आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात येईल.महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून “महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया!” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतील, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Railway : CSMT ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार भुयारी रेल्वे करणार

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबई महानगर क्षेत्राची जीवनवाहिनी आहे. वाजवी दरात वेगाने प्रवास करण्याचा

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर