राज्यातील ९ लाख ८४ हजार पेक्षा अधिक मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण लस

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत तीन महिन्यात राज्यातील ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.


गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ होत असून, १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या वयोगटातील मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.


भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात व ४२ हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.


या लसीकरण मोहिमेचे महत्त्व विशद करताना आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भाशयमुख कर्करोग हा वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यास टाळता येणारा आजार आहे. जागतिक स्तरावर या कर्करोगाचे निदान उशिरा झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते, मात्र किशोरवयातच दिलेली ही लस शरीरात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर देखील जनजागृती करण्यात येत असून, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन केले जाते.



३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक


लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होतात.



आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव


जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्व, बाल आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात येईल.महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून “महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया!” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतील, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा