मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना रविवारी, ८ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्याच्या तिकीटांपासून ते बुकिंग आणि स्टेडियममध्ये प्रवेशाच्या नियमांपर्यंत चाहत्यांमध्ये प्रचंड पाहायला मिळत आहे. अंतिम सामन्याची तिकिटे अधिकृतपणे ‘बुक माय शो’ आणि आयसीसीच्या पोर्टलवरून विकली जात आहेत. तिकिटांची प्रचंड मागणी असल्यामुळे सध्या बहुतांश कॅटेगरी ‘सोल्ड आउट’ झाल्या आहेत. मात्र क्रिकेटप्रेमींसाठी अजूनही आशा कायम आहे. ऑनलाइन तिकीट विक्री सुरू होताच क्रीडा प्रेमींच्या खरेदीसाठी एकच गर्दी उडाली आहे.
सामना पाहण्यासाठी महत्त्वाची माहिती : अहमदाबादच्या मोटेरा परिसरात असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. येथे सुमारे १ लाख तीन हजार प्रेक्षक बसू शकतात. मोठ्या गर्दीमुळे मोबाइल नेटवर्कवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिजिटल तिकीट आधीच डाउनलोड करून ऑफलाइन सेव करून ठेवणे आवश्यक आहे. भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे विजेतेपद राखणार का, याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्टेडियममध्ये प्रवेशाचे कडक नियम : अंतिम सामन्यासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडियमचे गेट सायंकाळी ३.३० वाजल्यापासून उघडले जातील, तर सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. त्यामुळे प्रेक्षकांनी किमान ३ तास आधी स्टेडियमवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून सुरक्षा तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळेल. स्टेडियममध्ये अनेक वस्तू नेण्यास मनाई असेल. पावर बँक, बॅग, पाण्याच्या बाटल्या आणि छत्री यांसारख्या वस्तूंवर पूर्ण बंदी असेल. प्रेक्षकांना फक्त मोबाइल फोन आणि वॉलेटच आत घेऊन जाण्याची परवानगी दिली जाईल.
तिकिटांची किंमत किती? : तिकिटांच्या किमतीबद्दल बोलायचे झाले, तर स्टेडियममधील वरच्या स्टँडसाठी सुरुवातीची किंमत सुमारे तीन हजार रुपयांपासून सुरू होते. तर प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आणि क्लब लाउंज सीट्ससाठी सुमारे ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत किंमत आहे.