मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतानाच फेरीवाल्यांपासून याची सुरुवात केली जाणार आहे. मुंबईच्या महापोर रितू तावडे यांनी फेरीवाल्यांमधील वाढत्या बांग्लादेशींना हटवण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ही कारवाई तीव्र केली जात असली तरी उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगरातील सर्व भागातील बांग्लादेशींचा शोध घेण्यासाठीविशेष समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे जाहिर केले. उपनगरातील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण २४ समित्या स्थापन करण्यात आल्या असून, तसेच या समितीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष समितीही गठित करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. मालाड आणि जोगेश्वरी परिसरात फेरीवाले तसेच मजुरी करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या व्यक्तींकडे जन्म प्रमाणपत्र किंवा आधारकार्ड यांसारखी अधिकृत कागदपत्रे नसल्याचे आढळून येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
उपनगरात एकूण २४ विधानसभा मतदारसंघ असून जोगेश्वरी, कुर्ला, अंधेरी, मालाड आदी रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या स्वरूपात बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध कंत्राटदारांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांमध्येही अशा नागरिकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा स्तरावर समित्या स्थापन करून संबंधित भागातील संशयितांची माहिती गोळा केली जाणार आहे. या २४ समित्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष समिती दरमहा अहवाल सादर करणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. ओळख पटलेल्या बांगलादेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार परत पाठविण्याची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करताना, विशेषतः फेरीवाल्यांमुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी फेरीवाल्यांकडून खरेदी करणेही काही ठिकाणी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे भाजप आता उपनगरातील बेकायदेशीर वास्तव्यासंबंधीचा प्रश्न गांभीर्याने हाताळणार असून, संबंधितांवर कारवाईसाठी या समित्या कार्यरत राहतील, असे लोढा यांनी स्पष्ट केले.