माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी २ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू, वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.


डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी लातूर जिल्ह्यात झाला. डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे (SRTMU) संस्थापक आणि कुलगुरू विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले असताना शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका मांडली. लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिवावर लातूर जिल्ह्यातच औसा तालुक्यातील कवठा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


मुख्यमंत्र्यांचा शोकसंदेश


विद्वत्ता, तत्वनिष्ठता आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्हिजन म्हणून आराखडा तयार केला. शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे लातूरला तत्कालीन संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार देखील मिळाला होता. राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी विविध संसदीय समितीवर काम केले. लातूरचे किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन आणि नांदेड – किनवटच्या आदिवासी संशोधन आणि अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताचे प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून म्हणणे मांडण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांवर विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांची ही ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची हानी आहे. आम्ही वाघमारे कुटुबिंयाच्या दुःखात सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

बोरीवली स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर बसवणार सरकता जिना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकला आता सरकता जिना जोडला जाणार

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३

नालेसफाई कंत्राटदारांची थकीत रक्कम देण्यास प्रशासन तयार, कंत्राटदार कामाला करणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार