मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन मंडळाने बदल केले आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाने बससेवेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी प्रवासी असलेल्या थांब्यांवरील सेवा कमी करून गर्दीच्या मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरु करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील काही मार्ग व थांब्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून हे बदल १ मार्चपासून लागू होणार आहेत.
मार्गांमध्ये करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत :
ए ६ बस आता बॅकबे आगाराऐवजी कुलाबा आगारापर्यंत धावेल.
ए २२ मार्ग विजय वल्लभचौकऐवजी जिजामाता उद्यान ते मजास आगारदरम्यान चालवला जाईल.
मार्ग ६९ वडाळा आगाराऐवजी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे संपेल.
ए ५१५ सेवा सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित राहील.
ए १ मार्गातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रुझ डेपोदरम्यान धावणारी ही बस वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकाचा वळसा टाळून माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोडमार्गे थेट धावेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.
ए १०१ मार्गाचा विस्तारही करण्यात आला आहे.
सध्या सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणारी ही बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत जाईल. परतीचा मार्ग डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकातून असेल. यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना अधिक सोय होणार आहे.
याशिवाय काही मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू केली जाणार आहे.
ए २०३ (आरसी चर्च – कमला नेहरू उद्यान),
ए ३२४ (शास्त्री नगर – चांदिवली बस स्थानक),
ए ३२६ (अंधेरी स्थानक पश्चिम – मिल्लतनगर),
ए ३४६ (अंधेरी स्थानक पश्चिम – रमेश नगर),
ए ३५४ (अंधेरी स्थानक पश्चिम – वीरा देसाई मार्ग विस्तारित),
ए ३८१ (माहुल गाव – कुलाबा बस स्थानक)
ए ४१२ (माजगाव आगार – मुंब्रा फाटा, ठाणे) या मार्गांवर एसी बस उपलब्ध होणार आहेत.
प्रशासनाने कोणताही मार्ग पूर्णपणे बंद केलेला नसून प्रवासीसंख्येनुसार फेरबदल केले असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या व्यवस्थेमुळे सेवा अधिक कार्यक्षम आणि जलद होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.