राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान पगारी रजा योग्य की अयोग्य याविषयी चर्चासत्राचे आयोजन शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आले आहे. या चर्चासत्रास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
चर्चासत्र दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संवाद साधण्यात येणार आहे. अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत - प्रभावळकर, कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, आरोग्य सेवा संचालनालय आयुक्त कादंबरी बलकवडे, स्त्रीरोगतज्ञ राजश्री कटके, आरोग्य सेवा संचालनालय संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, मनोविकार तज्ञ डॉ. अलका सुब्रमण्यम, सामाजिक कार्यकर्ता ॲड लक्ष्मी यादव, पत्रकार श्रीमती शर्मिला कलगुटकर आणि क्रिडा प्रशिक्षक पुजा सुर्वे यांच्याशी मजलिस संस्थेच्या अँड्र्यू डिमेलो या संवाद साधणार आहेत.
या चर्चासत्राच्या आयोजनाबाबत आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, मासिक पाळी दरम्यान पगारी रजा असावी किंवा नाही याबाबत चर्चा करताना समानता, मूलभूत हक्क, महिलांचे आरोग्य, रजेचे होणारे फायदे - तोटे, मासिक पाळी रजेतून लिंग समानता आणण्यासाठी कृती कार्यक्रम या अनुषंगाने ही सविस्तर चर्चा होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ञांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच विधी व न्याय विभाग, समाजसेवी संस्था, शिक्षण संस्था, मनुष्यबळ विकास तज्ञ अशा घटकांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे. सखोल चर्चेनंतर याबाबत राज्य शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.