मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे नवनाथ बन हे आज राजकीय संवाद आणि माध्यमविश्वातील एक प्रभावी नाव आहे. सध्या त्यांची भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली असून, यापूर्वी ते २०२३ पासून भाजप महाराष्ट्राचे माध्यम विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
शैक्षणिक व वैचारिक जडणघडण
नवनाथ बन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा बसवेश्वर हायस्कूल, कामठा येथे झाले. पुढे वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे नांदेडहून बीड येथे स्थलांतर झाले. सततच्या भ्रमंतीमुळे विविध प्रदेश, संस्कृती आणि माणसं जवळून पाहण्याची संधी मिळाली.
विद्यार्थी चळवळ आणि वक्तृत्व
महाविद्यालयीन जीवनातच नवनाथ बन यांचे प्रभावी वक्तृत्व विशेषत्वाने उठून दिसले. शेकडो विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची नाळ अनाहूतपणे तरुणाईशी जोडली गेली.
या काळात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. याचबरोबर २००४ ते २००८ या काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये बीड शहरमंत्री म्हणून काम करत शिक्षणविषयक प्रश्नांवर सक्रिय लढा दिला. बीड जिल्हा कॉपीमुक्त व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र करून अभियान राबवण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. याच नेतृत्वगुणांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्यांची निवड झाली.
पत्रकारितेकडे वाटचाल
महाविद्यालयीन शिक्षणानंतर मळलेली वाट नाकारत नवनाथ बन यांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला. २००८ साली बीडमधून पत्रकारितेला सुरुवात करत दोन वर्षांत गावकरी आणि मराठवाडा नेता या दैनिकांमध्ये शहर व जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
'एबीपी माझा'मधील पत्रकारिता प्रवास
जुलै २०१० मध्ये तत्कालीन ‘स्टार माझा’ (आताचे एबीपी माझा) या मराठी वृत्तवाहिनीत नवनाथ बन यांनी पत्रकारितेला सुरूवात केली. गेल्या जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ ते या वाहिनीत निर्माता (Producer) या पदावर निष्ठेने कार्यरत राहिले.
या काळात त्यांनी
• नमो व्हर्सेस रागा
• कोण होणार मुख्यमंत्री?
• नगरपालिकेच्या नाक्यावर
यांसारख्या गाजलेल्या कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकमानस समजून घेतले. लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. तरुणाईच्या करिअर ऑप्शन्सवर मान्यवरांसोबत सखोल चर्चा घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला.
सांस्कृतिक आणि सामाजिक संवेदनशीलता
पत्रकारितेत केवळ राजकारण नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक भान जपणारा दृष्टीकोन नवनाथ बन यांची ओळख ठरली.
पंढरपूरच्या वारीचे विशेष कव्हरेज असो किंवा ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमातून राजकारण, कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील दिग्गजांना विचारलेले परखड प्रश्न — यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
राजकीय संवादातील भूमिका
पत्रकारितेतील दीर्घ अनुभव, जनमानसाची खोल समज आणि धारदार शब्दसामर्थ्य यामुळे नवनाथ बन यांनी भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली.
• २०२३ पासून : भाजप महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख
• सध्या : भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते
या भूमिकेतून ते पक्षाची भूमिका ठामपणे, मुद्देसूद आणि प्रभावीपणे मांडत आहेत.
तरुणाईसाठी प्रेरणा
कोंढा या छोट्याशा गावातून मुंबईसारख्या महानगरात येऊन, केवळ शब्दांच्या बळावर माध्यमविश्वात आणि राजकीय संवादात स्वतःची ओळख निर्माण करणारे नवनाथ बन हे आज तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहेत.