मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी नवी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून, १२ उपाध्यक्षांसह ४३ जणांची कोअर टीम तयार केली आहे. विशेष म्हणजे मुंबई पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडे महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले आहे.
चव्हाण यांनी १२ जणांच्या खांद्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या उपाध्यक्षांकडे विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार, अतुल काळसेकर कोकण, भारती पवार उत्तर महाराष्ट्र, संजय कौडगे मराठवाडा, संजय भेंडे विदर्भ, रामदास तडस विदर्भ, केशव उपाध्ये मुंबई, प्रवीण पोटे विदर्भ, गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र, चैतन्य देशमुख मराठवाडा, प्रिया शिंदे पश्चिम महाराष्ट्र, सुजय विखे पाटील उत्तर महाराष्ट्र आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याशिवाय आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे यांच्याकडे सरचिटणीस पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे कोकण, मुंबई, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागाची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त १२ सरचिटणीस नेमण्यात आले आहे. आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे मुंबईचे कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. विविध सेलचे अध्यक्षही नेमण्यात आले आहेत.