मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई मोठ्या प्रमाणात कचरा होण्यास चिवडा,वेफर्स यांची वेष्टने ही कारणीभूत असतात. याचं पॅकेजिंगच्या कव्हर मुळे अनेकदा पावसाळ्यात नाले तुंबून मुंबई जलमय होते. त्यामुळे वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थ (स्नॅक्स), इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टीक वेष्टनांवर बंदी घालण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबई महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करत अशा खाद्यपदार्थांच्या उत्पादन कंपन्यांना व वितरकांना विघटनशील तथा पर्यावरणपूरक आवेष्टनाचा (पैकेजिंग) वापर सक्तीने लागू करता येईल अशी नियमावली बनवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारशी पाठपुरावा करण्याची सूचना केली आहे.
भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिका सभागृहात ठरावची सूचना मांडली आहे. या सूचनेमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या आबालवृद्धांपर्यंत वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थाच्या पुढया (पॅकेटस) पाच ते दहा रुपयांत सहन उपलब्ध होत असल्याने, अशा उत्पादनांची मोठया प्रमाणावर विक्री होत असते. मात्र, अशा साद्यपदार्थाचे सेवन केल्यानंतर, त्यांचे प्लास्टिक वेष्टन रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, पदपथांवर इतस्ततः तसेच, नाल्यांमध्ये टाकण्यात येत असल्याचे सर्रास निदर्शनास येते. त्यामुळे मुंबई शहरामध्ये कचच्याच्या प्रभागात अधिकाधिक वाढ होते.
याची प्लास्टिक वेष्टने अविघटनशील असतात आणि ती नाल्यांच्या मुखाशी जाऊन जमा झाल्याने, पाणी तुंबून पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होते. शिवाय, साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्यविधातक परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे वेफर्स, चिवडा, कुरकुरीत खाद्यपदार्थ (स्नॅक्स), इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अविघटनशील प्लास्टीक वेष्टनांवर बंदी घालण्यात यावी आणि अशा खाद्यपदार्थांच्या उत्पादन कंपन्यांना व वितरकांना विघटनशील / पर्यावरणपूरक आवेष्टनाचा (पैकेजिंग) वापर सक्तीने लागू करता येईल अशी महानगरपालिकेने नियमावली बनवावी असे नमूद केले आहे.