‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एक नवा वास्तववादी चित्रपट 'वध २' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कथेचा केंद्रबिंदू आहे शंभूनाथ मिश्रा (संजय मिश्रा), जो आर्थिक ओझ्याखाली दबलेला आणि वैयक्तिक आयुष्यात एकाकी पडलेला एक तुरुंग रक्षक आहे. त्याच्या आयुष्यात वळण येते जेव्हा त्याचा संपर्क मंजू सिंग (नीना गुप्ता) या कैद्याशी येतो. मंजू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, मात्र तिने तो गुन्हा केला असावा की नाही, याबाबत शंका आहे. एकीकडे तुरुंगातील या दोन जीवांमध्ये एक भावनिक जवळीक निर्माण होत असतानाच, एका रात्री राजकीय संबंध असलेला एक गुन्हेगार तुरुंगातून गायब होतो आणि संपूर्ण व्यवस्थेला धक्का बसतो. या प्रकरणाच्या तपासासाठी अतीत सिंग (अमित के. सिंग) हा कर्तव्यदक्ष अधिकारी सूत्रे हाती घेतो. इथूनच कथेला खरा वेग मिळतो. चित्रपटात केवळ रहस्यच नाही, तर समाजातील खोलवर रुजलेली जातीय समीकरणे आणि सत्तेचा संघर्ष देखील प्रभावीपणे मांडला आहे. यामध्ये पूर्वग्रहदूषित वृत्तीचा जेलर (कुमुद मिश्रा) आणि एका विकृत कैद्याची (अक्षय डोग्रा) भूमिका व्यवस्थेतील क्रूरता अधोरेखित करते. तुरुंगातील एकाकीपणा, मानवी भावना आणि राजकारण यांचा हा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आहे.



आधीचा वध हा चित्रपट तुम्ही पहिला असेल आणि आता त्याच्या सिक्वेलचा ट्रेलर पाहिला, तर कथेचा गुंता आणि त्यामागचं 'का' हे तुम्हाला सुरुवातीच्या काही मिनिटांतच लक्षात येऊ शकतं. निर्मात्यांनी मुद्दाम या चित्रपटातील मुख्य कलाकार आणि त्यांची पडद्यावरील नावे तशीच ठेवली आहेत. मात्र, यावेळी कथेची पार्श्वभूमी बदलली असून ती घरगुती ड्रामाऐवजी तुरुंगाच्या भिंतीआड घडते. न्यायव्यवस्थेतील त्रुटी आणि नैतिक गुंतागुंतीवर हा चित्रपट भाष्य करतो. 'दृश्यम' चित्रपटाने लोकप्रिय केलेला "नैतिक कारणासाठी केलेली हत्या" (Murder with a Moral) हाच धागा या चित्रपटातही जोडलेला आहे. एकाच संकल्पनेचा हा पुढचा टप्पा असल्याचे जाणवते. चित्रपटाचा वेग हा 'स्लो बर्न' म्हणजेच हळूहळू उलगडणारा असला, तरी प्रेक्षकांना फारसे अनपेक्षित धक्के मिळत नाहीत. मात्र, चित्रपटाचा शेवट आणि त्यातील 'फायनल ट्विस्ट' हा अत्यंत प्रभावी आहे. हा चित्रपट 'कर्मा'च्या सिद्धांताला एक नवा आयाम देतो. आपल्या पापाची शिक्षा मिळण्यासाठी पुढच्या जन्माची वाट पाहावी लागत नाही, तर याच जन्मात आणि याच ठिकाणी त्याचा हिशोब होतो, हे निर्मात्यांनी मोठ्या खुबीने मांडले आहे. जरी चित्रपट काहीसा प्रेडिक्टेबल वाटत असला, तरी शेवटच्या काही मिनिटांतील वळण प्रेक्षकांना थक्क करून सोडते.



दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांचा सामाजिक 'थ्रिलर'


लेखक-दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांचा नवा चित्रपट न्यायव्यवस्थेच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे करतो. जातीवाद, तुरुंगातील बंदीवास आणि सत्तेचा अधिकार या वास्तववादी गोष्टी त्यांनी या कथेत अत्यंत कौशल्याने गुंफल्या आहेत. सपन नरुला यांची सिनेमॅटोग्राफी आणि सिद्धांत मल्होत्रा यांचे प्रोडक्शन डिझाइन आपल्याला खऱ्याखुऱ्या तुरुंगात असल्याचे भासवते. नीना गुप्ता आणि संजय मिश्रा या जोडीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयातील शांत तीव्रता आणि भावनिक खोली सिद्ध केली आहे. संजय मिश्रा यांनी 'शंभू'च्या भूमिकेत आपली खास शैली आणली आहे, तर नीना गुप्ता यांनी 'मंजू'च्या पात्राला एक वेगळाच संघर्ष आणि डौल मिळवून दिला आहे. मात्र, या सगळ्यात कुमुद मिश्रा यांनी साकारलेला जेल सुप्रीटेंडेंट प्रकाश सिंग लक्ष वेधून घेतो. केवळ आडनावावरून माणसाची जात शोधणाऱ्या आणि स्वतःच्या पूर्वग्रहामुळे न्याय भरकटलेल्या अधिकाऱ्याच्या भूमिकेला त्यांनी अनेक छटा दिल्या आहेत. दिग्दर्शकाने 'चांगले' आणि 'वाईट' हे स्पष्ट करण्यात बराच वेळ खर्च केल्याने, कथेतील 'ग्रे शेड' (मध्यम बाजू) काहीशी दुर्लक्षित राहिली आहे. थ्रिलर चित्रपट असूनही यात पुरावे नष्ट करण्याची पद्धत अतिशयोक्तीपूर्ण वाटते. तसेच, आजच्या काळात तपासात महत्त्वाचे असणारे 'कॉल डिटेल्स' सारखे मुद्दे सोयीस्करपणे विसरले गेले आहेत. जेव्हा सहाय्यक कलाकार आपला हेतू सुरुवातीलाच स्पष्ट करतात, तेव्हा दोन तासांच्या चित्रपटात मुख्य गौप्यस्फोटापर्यंत पोहोचण्याचा प्रवास काहीसा संथ आणि ओढून ताणून केल्यासारखा वाटतो.



चित्रपटाच्या दुसऱ्या भागात विसंगतीचा फटका


संजय मिश्रा, नीना गुप्ता आणि कुमुद मिश्रा यांसारखे दिग्गज कलाकार जेव्हा एका 'स्लो बर्न' थ्रिलरमध्ये काम करतात, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. मात्र, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कथानकाचा समतोल बिघडल्याचे प्रकर्षाने जाणवते. चित्रपटाचा मूळ स्वभाव संथ आणि वास्तववादी असताना, त्यातील काही पात्रांची मांडणी या स्वभावाशी विसंगत ठरली आहे. तपास अधिकारी (Investigating Officer) साकारणारे अमित के. सिंग चित्रपटाच्या एकूण गांभीर्यामध्ये फिट बसताना दिसत नाहीत. त्यांचे अभिनय प्रदर्शन पाहताना असं वाटतं की, ते एखाद्या मोठ्या बॉलिवूड कमर्शियल चित्रपटासाठी 'ऑडिशन' देत आहेत. जिथे नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांसारखे कलाकार अभिनयाची एक वेगळीच उंची गाठत आहेत, तिथे एका गंभीर तपासादरम्यान अधिकाऱ्याचे शरीर प्रदर्शन (Body flaunting) किंवा सिगारेट ओढताना दिलेली स्टाईल अनावश्यक वाटते. दिग्दर्शकाने कदाचित चित्रपटात थोडे ग्लॅमर किंवा 'रंग' भरण्यासाठी हे केले असावे, पण या गंभीर थ्रिलरमध्ये तो प्रयोग सपशेल फसला आहे. अखेरीस, हा चित्रपट एखाद्या चांगल्या उद्देशाने लिहिलेल्या पण चुकीच्या ठिकाणी विरामचिन्हे (Punctuation marks) असलेल्या वाक्यासारखा वाटतो, ज्याचा मूळ अर्थ आणि प्रभाव मांडणीमुळे कमी झाला आहे.

Comments
Add Comment

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी

अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

'आई कुठे काय करते' फेमस 'ही' अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या तिच्या पार्टनरबद्दल

आई कुठे काय करते या मालिकेत ईशा हे पात्र रंगवणारी फेमस अभिनेत्री अपूर्वा गोरे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.