टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्या दमाची ही 'मराउडिंग' भारतीय संघ प्रथमच जागतिक मंचावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे.


कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात परतल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. आतापर्यंत सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहित शर्माने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जेतेपद जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. तर भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याने टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ फेव्हरेट मानला जात आहे.


स्फोटक फलंदाज इशान किशन यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सलामीैीला येण्याची शक्यता आहे, तर त्याला युवा प्रतिभावान अभिषेक शर्मा साथ देऊ शकतो. मधल्या फळीत टिळक वर्माची शांतता आणि हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूंची ताकद कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्यास सक्षम आहे. या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अमेरिकेच्या संघात असलेले 'स्थानिक' चेहरे. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर, अष्टपैलू हरमीत सिंग आणि शुभम रंजने हे तिघेही मुंबईकडून वानखेडेवर खेळलेले आहेत. आपल्या जुन्या सहकाऱ्यांविरुद्ध आणि ओळखीच्या खेळपट्टीवर खेळताना हे 'मुरब्बी मुंबईकर' अमेरिकेला विजयाची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह सांभाळणार असून त्याला अर्शदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा साथ देतील. फिरकीच्या जाळ्यात अमेरिकेला अडकवण्यासाठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सज्ज आहेत. मात्र, वानखेडेवरील दवाचा परिणाम खेळावर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये गट टप्प्यातील दिवसभरात रोज ३ सामने खेळवले जाणार आहे. हे तिन्ही सामने वेगवेगळ्या वेळांना खेळवले जाणार असून पहिला सामना ११ वाजता, दुसरा सामना ३ वाजता, तर तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. विविध ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत.


अमेरिकेला पलटवार करण्याची तयारी


अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानसारख्या माजी विजेत्याला नमवून आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंकेतील तीन आठवड्यांच्या सराव शिबिरानंतर अमेरिकेचा संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरत आहे.


भारताचे ‘अ’ गटातील सामने

  1. ७ फेब्रुवारी भारत वि. अमेरिका वानखेडे स्टेडियम मुंबई

  2. १२ फेब्रुवारी भारत वि. नामिबिया अरुण जेटली स्टेडियम दिल्ली

  3. १५ फेब्रुवारी भारत वि. पाकिस्तान आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो

  4. १८ फेब्रुवारी भारत वि. नेदरलँड्स नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना