मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार


वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना करणाऱ्या वाडा तालुक्याच्या विकासाला आता गती मिळणार आहे. मुंबई-बडोदरा महामार्ग (व्हाया पनवेल) आणि भिवंडी-वाडा-मनोर या दोन मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्ते सुधारत असल्याने एकेकाळी दळणवळणाच्या त्रासाला कंटाळलेले कारखानदार पुन्हा एकदा वाड्याच्या जमिनींकडे वळू लागले आहेत.


तालुक्याचा विकास करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी सरकारने 'डी प्लस झोन' योजना आणली. वीज, कर आणि कर्जात ३५% सवलती मिळाल्याने येथे सुमारे १,००० कारखाने सुरू झाले. मात्र, रस्ते निकृष्ट असल्याने उद्योजकांना मोठा फटका बसला. ८० ते ९० टनांच्या अवजड वाहनांमुळे साधे डांबरी रस्ते ४-५ महिन्यांतच उखडले जात होते. विशेषतः भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची गेल्या १३ वर्षांपासून दुरवस्था होती, जिथे गुडघाभर खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आणि निष्पाप जीवांचा बळी गेला.


भिवंडी-वाडा-मनोर मुख्य रस्त्याचे काम आता सिमेंट काँक्रीटीकरणामध्ये बदलण्यात येत असल्याने हा रस्ता दीर्घकाळ टिकणार आहे. काही महिन्यांतच हे काम पूर्ण होईल, ज्यामुळे वाहतूक जलद आणि सुरक्षित होणार आहे. दळणवळणाची साधने सुकर झाल्याने नवीन उद्योजक वाड्यात जागा शोधत असून येथील गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. रस्त्यांच्या कामामुळे उद्योजक सुखावले असले, तरी काही समस्या आजही कायम आहेत. विजेचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला आहे, मात्र पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा बिकट प्रश्न आजही उद्योजकांच्या मानगुटीवर बसलेला आहे. उद्योगांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा सरकारने पुरवल्या, तरच वाडा खऱ्या अर्थाने 'इंडस्ट्रियल हब' म्हणून नावारूपास येईल.


सद्यस्थितीत भिवंडी-वाडा मनोर व वडोदरा-मुंबई व्हाया पनवेल या रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले असून या रस्त्यामुळे वाहतूकीस चालना मिळणार आहे. वडोदरा मार्गावर चढण्यासाठी भिवंडी तालुक्यातील अकलोली व लामज या दोन्ही ठिकाणी जागा असल्याने उद्योजकांची वाहने या मार्गावरून प्रवास करून पुढे समृध्दी महामार्गाला मिळणार आहे. तसेच जेएनपीटी साठीही थेट जाणार असल्याने या दोन्ही मार्गावरून दिल्ली नागपूर कोकणात कुठेही जाऊ शकणार असल्याने उद्योजकांची मूळ समस्या मिटली जाणार आहे. तसेच कारखाने वाड्यात असले तरी कारखान्याचे मालक वरिष्ठ अधिकारी हे मुंबई ठाणे कल्याण वसई या शहरातून ते दररोज वाहनांमधून कारखान्यात यायचे मात्र खराब रस्त्यामुळे ते अक्षरश कंटाळले होते. अखेर रस्त्याचे काम होत असल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यातच भिवंडी शहरातून मोठी वाहने पास होताना अनेक अडचणींचा सामना उद्योजकांना करावा लागत होता आता वडोदरा रस्त्यामुळे भिवंडीत जाण्याचा प्रश्नच उरत नाही त्यामुळे वाहतूक कोंडीतूनही त्यांची सुटका होणार आहे.


केंद्र व राज्य सरकारने समृद्धी व मुंबई वडोदरा व्हाया पनवेल हे महामार्ग तयार केल्याने विकासाला गती मिळणार आहे. वडोदरा रस्त्यामुळे वाड्यातील उद्योजकांना अकलोली व लामज या दोन ठिकाणी रस्त्यावर जाता येणार आहे पर्यायाने ते जेएनपीटी, दिल्ली अहमदाबाद-नागपूर या ठिकाणी त्यांना जाता येणार असल्याने त्यांची दळणवळणाची सुविधा सुटलेली आहे.त्यातच वाडा भिवंडी मनोर या रस्त्याचे कामही सुरू असून ते काही महिन्यांत पूर्ण होईल. या दोन्ही रस्त्यामुळे वाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते


दळणवळणाची साधने अपुरी : वाड्यात यायचे असेल, तर फक्त रस्ता उपलब्ध आहे. रेल्वे, मेट्रो यांची सुविधा नसल्याने उद्योजकांना रस्त्याचाच आधार घ्यावा लागत होता त्यातच खराब रस्ते नित्याचीच वाहतूक कोंडीत अनेकदा तासनतास अडकून पडावे लागत आहे. अर्धा किमी अंतर पार करायला तासनतास लागायचं यामुळे उद्योजक अक्षरश: वैतागून त्यांनी गुजरात रस्ता धरला आहे.

Comments
Add Comment

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे

Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.