Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. पहाटेपासून कामाचा धडाका लावणारे आणि जनसामान्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावणारे 'दादा' आता आपल्यात नाहीत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या या अकाली एक्झिटने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसला आहे. नेहमी प्रसन्न चेहऱ्याने वावरणारे आणि आरोग्याप्रति अत्यंत जागरूक असणारे अजितदादा सतत लोकांच्या गराड्यात असायचे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना दादांच्या आठवणींना उजाळा दिला असून, ही पोस्ट वाचताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. एका मोठ्या आणि आधारवड असलेल्या नेतृत्वाच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



पोस्टमध्ये काय लिहिलंय रोहित पवार यांनी...?



 मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.

पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’


अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.


दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’



दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय…😭 Love U दादा!💔🙏

Comments
Add Comment

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी