बारामती : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांचे छोटे विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच शेजारील एका शेतात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) कडून देण्यात आली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामती येथील प्रचारसभांसाठी आपल्या खासगी विमानाने रवाना झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक (PA) देखील विमानात उपस्थित होते. विमान बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचले असता, लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान थेट एका शेतात कोसळले. सुरुवातीला अजित पवार आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. दुर्दैवाने, DGCA च्या ताज्या अहवालानुसार या अपघातात विमानातील सहाही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण बारामती शहर आणि परिसरात सध्या तणावाचे आणि दुःखाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांचा सखोल तपास केला जात असून, पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.