विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिरुवनंतपुरम येथे केले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतपुरम येथे पंतप्रधान मोदींनी पानूर ओव्हरब्रिजपासून पुथरिकंडम मैदानापर्यंत एक भव्य रोड शो केला. या दरम्यान त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. काही प्रकल्पांची पायाभरणी केली तसेच काही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच त्यांनी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचेही शुभारंभ केला आणि एक लाख लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जांचे वितरण केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की,विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे. विकसित भारताच्या निर्मितीत शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या ११ वर्षांपासून केंद्र सरकारने शहरी मूलभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की केंद्र सरकार शहरांतील गरीब कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात चार कोटींहून अधिक घरे बांधून ती गरीबांना देण्यात आली आहेत. यामध्ये शहरी गरीबांसाठी एक कोटींपेक्षा जास्त घरे उभारण्यात आली असून केरळमधील सव्वा लाख शहरी गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळाले आहे. ते पुढे म्हणाले की गरीब कुटुंबांचा वीजखर्च कमी व्हावा यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. गरीबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळत आहेत. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मातृ वंदना योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे केरळसह देशभरातील मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा लाभ झाला आहे.


पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गेल्या ११ वर्षांत कोट्यवधी नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे मोठे काम करण्यात आले आहे. आता गरीब एससी, एसटी, ओबीसी, महिला तसेच मच्छीमारांनाही सहजपणे बँक कर्ज मिळत आहे. त्यांच्याकडे हमीदार नसला तरी सरकार स्वतः त्यांची हमीदार बनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान म्हणाले की रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळांत माल विकणाऱ्या रेहडी-पटरीवाल्यांची परिस्थिती पूर्वी अत्यंत बिकट होती. त्यांच्या सक्षमीकरणासाठी पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे देशभरातील लाखो रेहडी-पटरीवाल्यांना बँकांकडून मोठी मदत मिळाली असून अनेकांना आयुष्यात पहिल्यांदाच बँकेकडून कर्ज मिळाले आहे. आता केंद्र सरकार एक पाऊल पुढे टाकत या लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड देत आहे. काही वेळापूर्वी तिरुवनंतपुरम येथेही पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले. यामध्ये केरळमधील १० हजार आणि तिरुवनंतपुरममधील ६०० लाभार्थी आहेत. पूर्वी क्रेडिट कार्ड फक्त श्रीमंतांकडे असायचे, पण आता रेहडी-पटरीवाल्यांकडेही क्रेडिट कार्ड असल्याचे चित्र दिसत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.



आगामी निवडणुका केरळची दशा-दिशा बदलतील


सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ही केरळमधील दोन प्रमुख आघाड्या असून, भाजप आता तळागाळात तिसरा प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले, "एलडीएफ आणि यूडीएफचे झेंडे वेगळे असले तरी त्यांचा अजेंडा एकच आहे - संपूर्ण भ्रष्टाचार आणि शून्य जबाबदारी. पूर्ण सांप्रदायिकता आणि कोणतीही उत्तरदायित्वाची भावना नाही. त्यांना माहिती आहे की पाच-दहा वर्षांनी पुन्हा सत्ता मिळेल. सरकार बदलते, पण व्यवस्था बदलत नाही. आता लोकांच्या हितासाठी आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारची गरज आहे. भाजप आणि एनडीए हे करून दाखवतील."

Comments
Add Comment

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला

Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या