मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पेटली आहे. काँग्रेसच्या मदतीने ‘उबाठा’ शिवसेना निर्विवाद बहुमतापर्यंत जाऊन पोहोचली असून भारतीय जनता पक्षाला केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या असून जनसुराज्य पक्षाला ४, यशवंत सेना १, अपक्ष १ असे महापालिकेतील पक्षीय बलाबल आहे. तब्बल २५ जागा मिळवून उबाठा शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
काँग्रेस पक्षासोबत उबाठाची निवडणूकपूर्व आघाडी झाल्याने आणि काँग्रेसला १२ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी मिळवली होती. यावेळी वरपूडकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तरीही त्यांच्या या प्रवेशाचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही.
नांदेड मनपामध्ये भाजपाचे ‘अशोक पर्व!’
नांदेड नगर परिषद ते नांदेड-वाघाळा महानगरपालिका या प्रवासाच्या अमृतमहोत्सवी पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या शहराच्या या मध्यवर्ती संस्थेमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस पक्षाला हद्दपार करत भाजपाचे कमळ फुलविण्याची अवघड मोहीम शुक्रवारी फत्ते केली. कमळ फुलल्याचा शहरभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या मनपाच्या २० प्रभागांतील ८१ जागांपैकी भाजपाने ६६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ४५ जागा जिंकून संस्मरणीय विजयाची नोंद केली. गेल्या निवडणुकीत मनपातून हद्दपार झालेल्या एमआयएमने दमदार पुनरागमन करत २४ वर्षे सत्ता गाजविणाऱ्या नेतृत्वहिन काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर फेकले आहे. दोन आमदार असूनही शिवसेनेची तसेच प्रचारादरम्यान नांदेडचा कारभारी बदलण्याचा नारा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडणुकीमध्ये धुळदाण उडाली.






