महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर
विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तीन ते चार मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने त्या ठिकाणी मतदारांना १ तास ताटकळत बसावे लागले. अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव सापडत नसल्याने बराच त्रास सहन करावा लागला. एकूण ११ लाख २६ हजार ४०० मतदारांपैकी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५ लाख १४ हजार ८६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मतदारांची मुदत संपेपर्यत अंदाजे ५७% मतदान झाले.
सकाळपासूनच मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. महापालिका निवडणुकीसाठी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करायला सुरुवात केली होती. १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत मतदारांची गर्दी वाढत होती. ९ प्रभागात मतदान प्रक्रियेसाठी शहरात १ हजार ३३५ मतदान केंद्र उभारण्यात आली. विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडत असल्यामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
सकाळच्या सत्रात विरार पूर्वेतील शिरगाव, वसई पश्चिमेतील गिरीज, वसई पूर्वेतील तारकेनगर, नाईकपाडा या ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रातील मतदान यंत्र बंद पडल्याचे समोर आले आहे. शिरगाव येथील मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारांची एक चित्रफित समोर आली असून त्यात या गैरसोयीबद्दल मतदार तक्रार करताना दिसून येत आहेत. शिरगाव प्रभाग क्रमांक एकमधील मतदान यंत्र तासभरापासून बंद पडले होते.
आजी-माजी आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क
नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानास मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांनी देखील मतदान केले. भारतीय संविधानानाने मतादानाचा हक्क दिला आहे, तो वाजवताना आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह मतदान केले. माजी महापौर प्रविणा ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी विरार येथील मतदान केंद्रावर एकत्रित मतदान केले. मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याने अनेक मतदारांची नावे इतर प्रभागात गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तर माजी प्रथम महापौर राजीव पाटील यांनी देखील विरार येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदान केले. यावेळी त्यांच्या ९२ वर्षीय आईंनी देखील मतदान केले.
प्रत्येक प्रभागनिहाय, १२ टेबलवर होणार मतमोजणी
टपाली मतदान मोजण्यासाठी एका टेबलची व्यवस्था. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजता पासून सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर होणाऱ्या मतमोजणीला ९ प्रभागांसाठी वेगवेगळे ९ कलर कोड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीचे ठिकाण शोधणे सोपे होणार आहे. प्रत्येक प्रभागनिहाय मतमोजणी एकाचवेळी १२ टेबलवर करण्यात येणार आहे. तर टपाली मतांची मोजणी करण्यासाठी एका टेबलची वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.
दुपारी ३.३० पर्यंत प्रभागनिहाय झालेले मतदान
- प्रभाग ए - ५३ हजार ५२५
- प्रभाग बी - ७७ हजार ६५२
- प्रभाग सी - ६६ हजार १९६
- प्रभाग डी - ५० हजार २४७
- प्रभाग ई - ५९ हजार २१५
- प्रभाग एफ - ६२ हजार २३२
- प्रभाग जी - ५३ हजार ६८८
- प्रभाग एच -४७ हजार ६०५
- प्रभाग आय - ४४ हजार ५०४
- एकूण ५ लाख १४ हजार ८६४
युवा वर्गाने मतदानाची ताकद ओळखावी
मतदान करणे हा आपल्या सर्वांचा हक्क आहे. मतदान केल्याने होणाऱ्या बदलाचे आपण साक्षीदार बनू शकता.त्यामुळे युवा वर्गाने मतदानाची ताकद ओळखावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असे आवाहन या निवडणुकीत पहिल्यावेळी मतदान केलेल्या दीप पाटील या युवा मतदाराने केले आहे.
मतमोजणीसाठी कुठे १२, तर कुठे १७ फेऱ्या
मतमोजणीसाठी प्रत्येक प्रभागनिहाय १२ टेबल लावण्यात आले आहेत. तर टपाली मतांची मोजणी ही एका वेगळ्या टेबलवर मोजणी केली जाणार आहे. नऊ प्रभागांमध्ये किमान १२ आणि जास्तीस्त जास्त १७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे पहिल्या काही प्रभागाचे निकाल हाती यायला दुपार होणार आहे.तर संपूर्ण ११५ जागांचे निकाल सायंकाळ पर्यंत बाहेर येतील. प्रभाग क्रमांक एक मध्ये टपाली मतांची मोजणी गृहीत धरून १४ फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. तर प्रभाग दोन मध्ये १७, प्रभाग तीन मध्ये १६, प्रभाग चार मध्ये १३, प्रभाग पाच मध्ये १४, प्रभाग सहा मध्ये १६, प्रभाग सात मध्ये १२, प्रभाग आठ मध्ये १२ आणि प्रभाग नऊ मध्ये ११ फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जाणार आहे.