आज तिरुवनंतपुरमला श्रीलंकेविरुद्ध सामना
तिरुवनंतपुरम : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवर आधीच कब्जा मिळवलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष्य आता श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात सलग चौथ्या विजयावर असेल. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवार (२८ डिसेंबर) हा सामना खेळवला जाईल. भारतीय संघाने या मालिकेत आतापर्यंत एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. पहिले तिन्ही सामने भारताने सहजपणे ८ विकेट्स राखून जिंकले आहेत. श्रीलंकेने दिलेल्या माफक लक्ष्यांचा पाठलाग करताना भारतीwय फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मालिका ३-० अशी खिशात टाकल्यामुळे, भारतीय संघाकडे आता उरलेल्या सामन्यांमध्ये संघ संयोजन तपासण्याची आणि राखीव खेळाडूंना संधी देण्याची उत्तम संधी आहे. हरलीन देओल किंवा अन्य युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
श्रीलंकेसमोर आव्हान : श्रीलंकेची कर्णधार चामरी अथापथ्थूच्या नेतृत्वात संघाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. मालिकेतील उरलेले सामने जिंकून लाज वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० रेकॉर्ड पाहता, भारताने २६ पैकी २० सामने जिंकले आहेत, जे त्यांचे वर्चस्व सिद्ध करते. आजच्या सामन्यातही भारतीय संघच फेव्हरेट मानला जात आहे.
दोन्ही संभाव्य संघ :
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी. कमलिनि (यष्टीरक्षक), श्री चरणी, वैष्णवी शर्मा.
श्रीलंका : चामरी अथापथ्थू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, इमेषा दुलानी, कौशिनी नुथ्यांगना, मालशा शेहानी, इनोका रणवीरा, शशिनि गिम्हानी, निमेशा मदुशानी, काव्या कविंदी, रश्मिका सेव्वांडी, मलकी मदारा.






