मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. पण उच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला. यामुळे माणिकराव कोकाटेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. उच्च न्यायालयात कोकाटेंच्या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार १९ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाती प्रत मिळताच विधीमंडळ कार्यालय माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याबाबत नियमानुसार निर्णय घेणार आहे.
शासकीय कोट्यात येणाऱ्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. आता अटक झाल्यास कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ शकते. कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही.
कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालाची पत्र प्राप्त झाल्यावर विधीमंडळ कार्यालय त्यांचा निर्णय घेणार आहे. अद्याप विधीमंडळाला निकालाची प्रत मिळालेली नाही.
विधानसभेची निवडणूक जिंकल्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली. या सरकारमध्ये कृषीमंत्री झालेल्या कोकाटेंचे पद काही महिन्यांनी बदलण्यात आले. सध्या कोकाटे क्रीडामंत्री आहेत. पण ज्या प्रकरणात कोकाटेंना दोषी ठरवण्यात आले आहे ते प्रकरण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असतानाच्या काळातले आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यामुळेच कोकाटेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहंची भेट
माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कोकाटेंची मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात असताना धनंजय मुंडेंनी अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री होते. पण करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. कौटुंबिक वादाची माध्यमातून चर्चा सुरू झाली. अखेर धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर धनंजय मुंडे अद्याप मंत्री झालेले नाहीत. पण आता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे कोकाटे अडचणीत सापडल्यास धनंजय मुंडे यांना मंत्री केले जाणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.