मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये घडली आहे. गोरेगावच्या पश्चिमेकडील भागात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहाटे तसेच रात्री उशिरा रस्त्यावर वावरण्यास नागरिक घाबरत आहेत. कुत्रे टोळक्याने येऊन हल्ला करतात त्यामुळे बचावाची संधीच मिळत नाही, असे स्थानिकांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शाळा, वसाहती, बाजारपेठांच्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची टोळकी बिनबोभाट वावरताना दिसू लागली आहे. श्वानप्रेमी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना दूध बिस्किटांपासून ते चिकन मटणापर्यंत खाऊ घालत आहेत. यामुळेच गोरेगावमध्ये कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
दररोज गोरेगवच्या वेगवेगळ्या भागांतून कुत्रे चावल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या तक्रारी वाढू लागल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






