Thursday, July 23, 2026

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही क्षणी पवना नदीपात्रात कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून यासंदर्भात अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरणात पाण्याची सतत आवक सुरूच आहे. त्यामुळे हवामानातील बदल आणि वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

धरणातून विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना अधिकृत माध्यमातून पूर्वकल्पना दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खालील मुद्द्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:

  • नदीपात्रात जाणे टाळावे: पवना नदीपात्रात किंवा नदीकाठी पर्यटनासाठी, मासेमारीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
  • साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे: नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांनी आपली शेती अवजारे, कृषी पंप, मोटारी, पाईपलाइन, जनावरे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे.
  • प्रशासन सज्ज: अचानक विसर्ग झाल्यास नदीपात्रातील पाणी वेगाने वाढू शकते. कोणतीही जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी ग्रामपंचायती, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी स्पष्ट केले आहे की, धरणातील पाणीसाठा आणि पाण्याची आवक यावर पूर्ण डोळा ठेवूनच विसर्गाचा निर्णय घेतला जाईल. विसर्ग सुरू करण्यापूर्वी योग्य ती पूर्वसूचना दिली जाईल, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पावसामुळे धरणातील पाणीसाठा उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने संपूर्ण मावळ तालुक्याचे या परिस्थितीकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >