इस्लामोफोबिया वाढल्याची पाककडून टीका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरात ध्वजारोहण केले. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे. भारताने आता यावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत पाकिस्तानला ढोंगीपणाचा प्रचार थांबवावा आणि वर्तन सुधारावे, असे सुनावले आहे.
राम मंदिरातील ध्वजारोहणावरील पाकिस्तानच्या टीकेला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही पाकिस्तानचे आरोप पूर्णपणे नाकारतो. धर्मांधता, दडपशाही आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा कलंकित इतिहास असलेल्या पाकिस्तानला इतरांना उपदेश करण्याचा नैतिक अधिकार नाही. ढोंगी उपदेश देण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या देशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाची अत्यंत वाईट आकडेवारीवर पाहावी.”
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवला. त्याद्वारे सांस्कृतिक उत्सवाचा आणि राष्ट्रीय एकतेचा नवा अध्याय सुरू होत आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरावर मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी धर्मध्वजा फडकवण्यात आली. या घटनेवर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी भारतात इस्लामोफोबिया (इस्लाम धर्माबद्दल द्वेष) वाढत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ऐतिहासिक स्थळांचा अनादर होत असल्याचे म्हटले आहे. अयोध्येतील राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बांधले गेले आहे. न्यायालयाने वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला देण्याचे आदेश दिले होते.
राम मंदिराचा धर्मध्वजा फडकावण्याचा सोहळा पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पंतप्रधान मोदींनी या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी याला भारतात अल्पसंख्याकांबद्दल भेदभावपूर्ण वागणूक म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "हा नवीन प्रकार भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर वाढत्या दबावाला आणि हिंदुत्व विचारसरणीच्या प्रभावाखाली मुस्लीम सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जाणीवपूर्वक नष्ट करण्याच्या प्रयत्नांना दर्शवतो."
इस्लामोफोबिया अन् संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना
पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक ऐतिहासिक मशिदींना अनादर किंवा पाडल्या जाण्याचा धोका आहे. त्याच वेळी, भारतीय मुस्लीम सतत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या बाजूला ढकलले जात आहेत." इतकेच नाही, तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीची याचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "भारतातील वाढत्या इस्लामोफोबिया, द्वेषपूर्ण भाषणे आणि द्वेषातून प्रेरित हल्ल्यांकडे लक्ष द्यावे."