नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते. २०१९-२०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या एकूण ४८.७६ कोटी लाडूंपैकी हे लाडू होते, अशी माहिती श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे. ही आकडेवारी २०१९ ते २०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादाच्या एकूण ४८७.६ दशलक्ष लाडूंपैकी २० कोटी लाडू हे भेसळयुक्त तुपाचा वापर करुन बनवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या, खरेदीची माहिती आणि उत्पादन आणि विक्रीचे आकडे यांचा विचार करून साध्या गणनेच्या आधारे हे आकडे काढण्यात आले आहेत. एसआयटीने अलीकडेच या प्रकरणासंदर्भात टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांची आठ तास चौकशी केली. प्रयोगशाळेने नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली असूनही त्यांनी तूपाच्या टँकरना परवानगी का दिली असे विचारले असता, त्यांनी दावा केला की अहवाल त्यांच्यासमोर कधीही सादर करण्यात आला नाही. खरेदी तांत्रिक समितीच्या शिफारशींनुसार केली गेली.त्यांचे माजी सहाय्यक चिन्ना अप्पाना यांना अटक करण्यात आली आहे.
एसआयटीने टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांचीही चौकशी केली आहे. नेल्लोर येथील न्यायालयात त्यांनी आपले महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, १५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, सूत्रांनी असे म्हटले आहे की, या पाच वर्षांत अंदाजे ११ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. मात्र भेसळयुक्त तुपापासून बनवलेले लाडू नेमके कोणी घेतले हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे स्पष्ट केले आहे की, व्हीव्हीआयपी लाडू देखील वेगळे ओळखता येत नव्हते.






