नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे ऐन थंडीत वातावरण तापले
सुभाष म्हात्रे अलिबाग (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी रायगड जिल्ह्यात सुरु असून, जिल्ह्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि तीन खासदारांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नगरपालिकांवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या नेतेमंडळींना खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रयत्नात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्यातरी रायगड जिल्ह्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलेले असून, जस-जसा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. तसे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः खासदार सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांना राजकीयदृष्ट्या आपले प्राबल्य वाढविण्यासाठी या नगरपालिका निवडणुकांकडे गांभीर्याने पहावे लागत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. या निवडणुकांनंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीचा कठीण पेपर कोण सोडविणार याकडे रायगडकरांचे लक्ष आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, महाड, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली या नगरपालिकांच्या निवडणुका चार वर्षांनी होत असल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अंगात उत्साह संचारलेला आहे. त्यामुळे या सर्व नगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाडमध्ये गोगावले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपसमवेत युती केली आहे. त्यामुळे महाड जिंकणे हे तटकरे आणि गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. असाच प्रकार रोहा, कर्जत, श्रीवर्धन, खोपोलीमध्येही निर्माण झालेला आहे. तेथेही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच राजकीय सामना होणार असल्याने खासदार सुनिल तटकरे विरुद्ध आमदार महेंद्र थोरवे यांचा कस लागणार आहे. कर्जतला भाजपाने शिवसेनेला साथ दिली आहे, तर खोपोलीत शिवसेना, भाजप, रिपाइं एकत्र आलेले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ठाकरे शिवसेना आणि शेकाप यांची मोट बांधून विकास परिवर्तन आघाडी गठीत केलेली आहे. त्यामुळे येथेही थोरवे आणि तटकरे यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. माथेरानमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध महायुती असाच सामना होणार आहे. अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेस यांची महाआघाडी आहे. त्या विरोधात शिवसेना, भाजप एकत्र आलेले आहेत. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाही. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेली नाही. उरणला भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात शिवसेना आणि महाविकास आघाडीही मैदानात उतरलेली आहे. यामुळे येथे भाजपचे आमदार महेश बालदी यांना आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार एवढे निश्चित. रोह्यात खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात शिवसेना उभी ठाकली आहे. अशी स्थिती श्रीवर्धन, मुरुडला देखील आहे. एकूणच महायुतीच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघातील नगरपालिकांवर सत्ता टिकविण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की !