Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सातत्याने घसरण होत असून थंडीची लाट (Temperature Drop) पसरत चालली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागांसह शहरांमध्येही लोकांनी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय, राज्याच्या उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत तापमानात आणखी लक्षणीय घट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी गारठा अधिक वाढण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढतच; धुळ्यात ८ अंश


राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असले, तरी हवामान मात्र उलट चित्र दाखवत आहे. अनेक भागांत थंडीचा कडाका जाणवू लागला असून तापमानात सतत घट होत आहे. रविवारी धुळे जिल्ह्यात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद झाली, ज्यामुळे उत्तरेकडील महाराष्ट्रात थंडीची तीव्रता अधिक स्पष्टपणे जाणवली. या गारव्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायामासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली असून राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. वाढत्या गारठ्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटण्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर, स्वेटर, जॅकेट, मफलर आणि गरम कपड्यांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिकांनी विशेषतः सकाळ-संध्याकाळी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.



परभणीत गारठा वाढला; तापमान १० अंशाखाली, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत


परभणी शहर आणि परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका सातत्याने कायम असून तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने प्रचंड गारठा जाणवत आहे. हवेतल्या गारव्यामुळे दिवसभरही थंडी टिकून राहत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांकडून उबदार कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. सकाळच्या वेळेत ग्रामीण भागातून शहरात येणारे दूध विक्रेते, भाजी विक्रेते आणि इतर कामगारवर्ग यांना या थंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. गारठा वाढल्यामुळे ग्रामीण आणि नागरी भागात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, या हवामानाचा रबी हंगामातील गहू व हरभऱ्यासारख्या पिकांना फायदा होणार असल्याचे कृषी तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जरी नागरिक त्रस्त असले तरी शेतकऱ्यांसाठी ही थंडी काही प्रमाणात दिलासादायी ठरत आहे.



महाबळेश्वर ‘मिनी काश्मीर’चा गारवा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी


सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून, विशेषतः महाबळेश्वरमध्ये तापमानातील घसरण जाणवण्याजोगी आहे. ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये मागील आठ दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढत असून दिवस–रात्रीच्या तापमानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. दिवसा ऊन चांगले असले तरी रात्री गारठा आणि थंड वाऱ्यांचा जोर अधिक जाणवत आहे. महाबळेश्वर शहरात किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून वेण्णा लेक परिसरात त्यापेक्षाही कमी तापमान आहे. वाढलेल्या गारव्यामुळे सकाळच्या वेळेत वेण्णा लेकवर फिरण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी दिसत आहे. कडाक्याच्या थंडीत निसर्गाचे मोहक रूप खुलून दिसत असल्याने पर्यटक हा अनुभव अगदी आनंदाने घेत आहेत. महाबळेश्वरच्या काही किलोमीटर बाहेर गेल्यानंतर जाणवणारी बोचरी थंडी आणि शहरातील गुलाबी थंडी यातील फरक पर्यटकांसाठी खूपच रोचक ठरत आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी स्वेटर, जॅकेट, कानटोपी अशा उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. थंडी वाढल्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक, दूध विक्रेते तसेच औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी या गारव्याचा सामना करताना दिसत आहेत. एकूणच, वाढलेल्या



तापमान १२ अंशांवर; रब्बी हंगामाला वेग, सातपुड्यात गारठा वाढला


नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम पट्ट्यात थंडीचा जोर सातत्याने वाढत असून तोरणमाळमध्ये तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात गारठा इतका वाढला आहे की नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. घटत्या तापमानामुळे सातपुड्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. सकाळच्या वेळेत रस्ते ओस पडलेले, तर रात्री पुन्हा एकदा शेकोट्या पेटवून ऊब मिळवणारे नागरिक दिसत आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, या कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागात रब्बी हंगामाच्या पेरणांना वेग आला आहे. गारठ्याचा परिणाम जरी सामान्य नागरिकांवर जाणवत असला तरी शेतकऱ्यांसाठी हे वातावरण पिकांसाठी पोषक ठरत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.


Comments
Add Comment

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण